ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

वडापाव



       सध्या मस्त पाऊस चालू आहे,गरमागरम भजी खायची इच्छा होतेय,मस्त कॉफी पीत खिडकीत बसून पाऊस बघावासा वाटतोय! पण... ऑफिस! जाऊ दे!
       अशा वातावरणात मस्त गरमगरम वडापाव मिळाले तर काय मजा येईल! आहाहा...
आमच्या गावी एक वडापाववाला आहे, घाशीलाल त्याचं नाव! घाशीलालचा वडापाव आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. चार भाऊ मिळून ते दुकान चालवतात. प्रत्येक भाऊ महिन्याचा एक एक आठवडा दुकान चालवतो. त्या आठवड्याचा खर्चही त्याचा आणि येणारं सर्व उत्पन्नही त्याचंच! असे महिन्याचे चारही आठवडे त्यांनी वाटून घेतलेत. मस्त एक आठवडा बिझनेस करायचा आणि तीन आठवडे आराम, तरीही प्रत्येक भावाची गणना गावातल्या श्रीमंतांमधे होते, इतकं ते एका आठवड्यात कमवतात. त्या दुकानात कधीही जा, वडापाव घ्यायला रांग असते. आपला नंबर यायला किमान पंधरा मिनिट तरी लागतात इतकी गर्दी असते. घाशीलालच्या वडापावचं हेच वैशिष्ट्य आहे. त्याच्याकडचा वडा म्हणजे काही साधासुधा नसतो, तर आपण जनरली जेवढया साईजचा वडा बघतो, त्याच्या दुप्पट तरी त्याची साईज असते. आणि एकदम तिखट! दिवसाला दोनेक हजार वड्यांची तरी विक्री होतेच होते. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी हा आकडा अजून वाढतो.
      आम्ही शाळेत असतांना सकाळी सात वाजता टेक्निकल हायस्कूलला जायचो तेव्हा त्याच्या दुकानासमोरुन जावं लागायचं. तेव्हा त्याच्याकडच्या लोकांची वड्याचं मिश्रण बनवण्याची लगबग चालू असायची. एका मोठ्या काहीलीत बटाटे उकळत असायचे. दोन जण खाली बसून खलबत्यात मिरची आणि आलं कांडत बसलेले असायचे. त्यांच्या बाजूला मिरची आणि आल्याचं पोतं पडलेलं असायचं. एक जण पोतंभर कांदे चिरत बसलेला असायचा. शंभर किलोच्यावर तरी वड्याचं मिश्रण सकाळी आठ वाजेपर्यंत तयार असायचं. त्यानंतर मोठ्या चुलाणावर मोठ्ठी कढई चढवून आचारी वडे बनवायला बसायचे. तोपर्यंत तीस-चाळीस तरी गि-हाईकं दुकानात आलेलीच असायची. एका वेळेस ते साधारण शंभरेक वडे तळत असत. वडे काढले रे काढले, की दोन वेटर्स ते गरमागरम वडे लगेच बांधून गि-हाईकांच्या ऑर्डर्स पु-या करत असत.
       ह्या वड्यांचा सगळ्यात मोठा ग्राहकवर्ग म्हणजे हातावर पोट असलेला कामगारवर्ग! बांधकामावर काम करणारे मजूर, विटभट्ट्यांवर काम करणारे कामगार, बाहेरगावच्या ट्रकचे ड्रायव्हर्स हे नेहेमी हे वडे नेतात. त्या वड्याची साईजच इतकी मोठी असते की एक-दोन वड्यात एका वेळेचं पोट भरतं. ट्रक ड्रायव्हर्स आले की त्यांची ही वडे खाण्याची कॅपेसिटी बघावी, जिथे एक वडा खाता आपल्याला थोडं होतं तिथे हे ड्रायव्हर्स बिनधास्त आठ आठ वडे खातात. त्या वड्यांबरोबर मस्तपैकी लसनाची चटणीही असते, पण मुळात वडाच इतका तिखट असतो की सहसा चटणी खायच्या फंदात कुणी पडत नाही.
      आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवासी वर्गांना जायचो तेव्हा दुस-या दिवशी निघतांना आमच्या सिनिअर्सकडून सगळ्यांना नाष्टा असायचा. आणि नाष्टा ठरलेला असायचा, तो म्हणजे घाशीलालचा वडापाव! इतका भरपेट नाष्टा झाल्यावर जेवणाचे बारा वाजणार हे ठरलेलंच असायचं. कुणाच्या घराचं बांधकाम चालू असेल तर तिथले मजूर मालकाला म्हणायचे, "साहेब जरा वडे आणि जिलबीचं बघा ना!". त्यांना घाशीलालचे वडे आणि थोडीशी जिलबी आणून दिली की ते पण खूष आणि आपणही!
      खरं तर ह्या वड्यांनी खूप लोकांचा एका वेळचा पोटाचा प्रश्न सोडवलाय! हमाल असू द्या, हातगाडीवाले असू द्या, मजूर असू द्या, क्लासच्या घाण्याला जुंपलेले विद्यार्थी असू द्या, किंवा कुणीही सामान्य मध्यमवर्गीय असू द्या, जिभेला चव आणि वेळोवेळी पोटाला आधार ह्या वड्यांनीच दिलाय, फक्त माझ्या गावातच नाही, सगळीकडेच! मुंबईकरांचा ’वडा’ हा एकदम जिव्हाळ्याच्या विषय आहे. कुणी त्याचा ’शिववडा’ करुदेत, नाहीतर आणखी काही, वडा आणि सामान्य माणूस एकमेकांना कधीच सोडणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!

(चित्रे आंतरजालावरुन साभार)



शुक्रवार, २९ जुलै, २०११

"बाळा हळूच रे!"


"बाळा हळूच रे!"
      सध्या हाच घोष सगळीकडे ऐकू येतोय! आपल्याला आपल्या लहानपणी जे हाल सोसावे लागले ते आपल्या मुलांना सोसावे लागू नयेत ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. त्यात वावगं काहीच नाही, पण ही काळजी घेतांना आपलं मूल किती पंगू आणि परावलंबी होतंय हे त्यांच्या कधी लक्षात येणार?
निमित्त होतं एका लग्नाचं. मी जवळच्याच नात्यातल्या एका लग्नाला गेलो होतो. माझे दोन-चार वर्षांपूर्वी लग्न झालेले भाऊ-बहिणही लग्नाला आले होते. प्रत्येकाच्या कड्यावर किमान एक तरी कॅलेंडर होतं. घरचंच लग्न म्हटल्यावर दोन-चार दिवस आधीच सगळे आलेले होते. सगळे भाऊ-बहिण आपल्या इथल्याच मातीत वाढून गेलेले, एकत्र खेळलेले, गुढगे फोडून घेतलेले, मनसोक्त मातीत लोळलेले! पण त्यांचं पिल्लू कडेवरुन खाली उतरलं रे उतरलं की,"बाळा तिकडे मातीत नको जाऊस! तुझ्या पायाला माती लागेल! छी: छी: असते माती!"
       अरे! माती छी: छी: कधीपासून झाली? ज्या मातीत तुम्ही लहानाचे मोठे झालात ती माती छी: छी:? तुम्ही, किंबहुना आपण सगळे लहानपणी मातीत, चिखलात जो धुडगूस घालायचो तो विसरलात? मातीला विसरलात? तेव्हा आपले आईवडिल बघायचेही नाहीत की मुलं काय करताहेत आणि कुठे खेळताहेत? अंगाला माती लागल्याशिवाय मोठं होता येतं? आम्ही तरी नाही झालो. तुम्हाला असं कसं वाटतं की मातीशिवाय तुम्ही मोठं होऊ शकता! शक्यच नाही!
      मुलांना जपणं हा वेगळा विषय आहे आणि अति जपणूक हा वेगळा विषय आहे. आज तुम्ही मुलांना मातीपासून दूर ठेवत आहात आणि जर उद्या मुलं मातीला विसरलीत, नव्हे ती विसरतीलच, तर तो दोष त्यांचा नाही, तुमचा आहे! खडे बोचल्याशिवाय त्यांना बोचणं म्हणजे काय हे कळणारही नाही. अशी कचकड्याची खेळणी उद्या जगाच्या बाजारात किती टिकाव धरू शकतील? त्यांचा पायाच कमकुवत राहतोय! एक गोष्ट नक्की की तुम्ही तुमच्या मुलांना जगातल्या सर्वोत्तम सुखसुविधा देऊ शकता, पण त्यांचं स्वत:चं असं आकाश? ते तर त्यांनाच निर्माण करावं लागणार आहे ना? की ते बापाच्या खिशातून पैसे घेतले आणि आणलं विकत इतकं सोपं आहे? तुम्ही आज ज्या ठिकाणी पोचला आहात तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही अपार मेहनत केली आहे, प्रचंड कष्ट केलेले आहेत, पण याचा अर्थ तुमच्या मुलांना तुम्ही सगळं काही रेडीमेड द्यावं असा मुळीच होतं नाही. बोचू द्या ना त्यांनाही एखादा काटा, एखादा दगड! फुलं फक्त तोडण्यासाठी नसतात हेही दाखवा त्यांना जमल्यास! झाडावर फूल येण्याची प्रक्रिया कशी घडते हेही कळूदेत त्यांना! त्यासाठी आधी तुम्ही निसर्गात जायला हवं! पण तिथेही माती आहेच ना! छी: छी:! मग कसं जाणार तुम्ही? निसर्गात जायचं म्हणजे तुमची कशी एक वन-डे ट्रीप असते. स्वत:च्या, मित्राच्या कारने किंवा एखादी भाड्याची गाडी करुन जवळपासच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायचं, मस्त धिंगाणा घालायचा, भरपूर फोटो काढायचे आणि घरी आल्यावर किंवा जमल्यास तिथूनच फेसबुकवर अपलोड करायचे! झालं तुमचं निसर्गदर्शन!
कुठल्या एकत्र यायच्या ठिकाणीही, जसं लग्नात, सगळ्या ताया, वहिन्या आपापल्या मुलांना कड्यावर गॅसबत्तीसारखं घेऊन फिरणार! "काय करू रे तो/ती ऐकतच नाही ना!" त्या लहान पोरांचंही सारखं आपलं "अ‍ॅ अ‍ॅ अ‍ॅ" चालूच! त्यांचंही काही चुकत नाही! तुम्ही जर त्यांना माणसंच दाखवली नाहीत तर अशा ठिकाणी ती बावरणारच! त्यांना आंजारुन-गोंजारुन, वेळप्रसंगी रागावून तुम्ही मोकळं खेळायला लावू शकत नाही? आजच्या नव्वद टक्के आयांना आपल्या मुलांना रागवणं आवडत नाही! त्या स्वत: तर रागवत नाहीतच पण कुणी रागावलं की आधीच यांना राग येतो! आधीच ते एकटं मूल असल्याने लाडाने वेडं करुन ठेवलेलं असतं, आणि वरुन तुम्हीची त्याचे फालतू लाड करा हे यजमानांना सांगणं! तो बिचारा यजमान आधीच आपल्याकडच्या कार्याने वैतागून गेलेला असतो, त्यात आणखी ही भर! बरं ही उपद्यापी कार्टी बरोब्बर घरातलं किमती सामान हेरतात आणि त्याची नासधूस सुरु करतात! बरं त्यांना रागावलं की त्यांच्या आधीच त्यांच्या आया घर डोक्यावर घेतात. एखादं पोरगं चुकुन रडलंच तर कसा प्रलय झाल्यासारखी भीती त्याच्या आईबापांना वाटते, ते तरी रडल्याशिवाय मोठे झालेले असतात का? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा किती वेळा धडपडलोय, पडलोय आणि म्हणून जगात अजूनही टिकून आहोत!
       मुलांना मोकळं खेळू द्या! पडू द्या! मातीत लोळू द्या! आणि महत्वाचं म्हणजे ते या समाजाचेही भाग आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवायलाच हवं! त्याकरता तुम्ही जरा सोशल व्हा! त्यांना सांगा, तू हरलास तर मी तुझ्या पाठीशी आहे, पण मी तुला रेडीमेड काहीच देणार नाही! लढ बाप्पू लढ!

    बाय द वे, तुम्हाला काय वाटतं?


    --चित्रे आंतरजालावरुन साभार


सोमवार, २५ एप्रिल, २०११

विकतचं सुख

परवा मी आणि बायको सहज म्हणून मॉलमधे गेलो होतो. घ्यायचं असं काहीच नव्हतं, पण जस्ट टाईमपास म्हणून! तिथे एक मुलगा आला, असेल वीसेक वर्षांचा! व्यवस्थित कपडे घातलेला, केस चांगले चापूनचोपून व्यवस्थित बसवलेला आणि चेहे-यावर ब-यापैकी आत्मविश्वास असलेला! आला तो सरळ माझ्याकडे!
"सर एक काम होतं." -तो.
"काय?" -मी.
"सर प्लीज हा फॉर्म भरुन देता का?"
"का?"
"सर मी अबक कंपनीकडून आलेलोय. आमची एक प्रमोशनल ऑफर आहे. त्याबद्दल आम्ही एक लकी ड्रॉ काढतोय. त्यासाठी तुमची माहीती हवी होती. फक्त नाव आणि मोबाईल नंबर द्या!"
"बरं मग मीच का?"
"तसं नाही सर, इथे येणा-या रॅन्डम लोकांकडून आम्ही फॉर्म भरुन घेत आहोत. यात जर तुमचा नंबर लागला तर आम्ही तुम्हाला तसं फोन करुन कळवू! यात तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे!"
"एक विचारु, हा डेटाबेस विकण्याचा तर प्लॅन नाही!" माझं डोकं आधीच्या आधीच निगेटीव्ह चालायला लागलं!
"नाही सर, विश्वास ठेवा!" त्याच्या चेहे-याकडे बघून हा तितका बनेल असेल असं काही मला वाटलं नाही. म्हटलं याला जरी माहिती दिली तर हा फार फार तर काय करेल, एखाद्या कंपनीला माहिती विकून पैसे कमवेल. ती कंपनी आपल्याला कॉल करेल, सर ही ऑफर आहे, ती ऑफर आहे, असं आणि तसं! आपण अशा ऑफर्सला नाही सांगू शकतो. असा विचार करुन मी त्याला फॉर्म भरुन दिला.
ही गोष्ट मी विसरुनही गेलो. रविवारी सकाळी त्यांचा फोन आला.
"सर मी अबक कंपनीमधून अमुक अमुक बोलतेय. काल तुम्ही अमुक अमुक मॉलमधे कूपन फॉर्म भरुन दिला होता का?" - एक नाजूक आणि मंजूळ आवाज.
"हो, का?"
"सर अभिनंदन! तुमच्या कुपनला बक्षिस लागलंय! आज तुम्ही आणि तुमच्या मिसेस बक्षिस घ्यायला येऊ शकता का? आज संध्याकाळी पाच वाजता अमुक अमुक ठिकाणी... मी तुम्हाला पत्ता एसएमएस करते. तुम्हाला एक बाऊल सेट आणि पंचवीस हजार रुपयांचं एक गिफ्ट हॅम्पर मिळालेलंय!"
मी अजून धक्क्यातून सावरतच नव्हतो! इतकं मोठं बक्षिस! मला... का पण? काही कळेचना! बायकोला सांगितलं. तिलाही खूप आनंद झाला! शेवटी विचार केला जाऊन तर बघू! हे प्रकरण काय आहे हे तिथे गेल्यावरच कळेल. तेव्हाच त्या नाजूक आवाजाला सांगून टाकलं की आम्ही येतोय. तरीही डोक्यात किडा वळवळतच होता की हे नक्की असं काही नाहीये! देव माझ्यावर इतका मेहेरबान नक्कीच नाहीये! काहीतरी वेगळंच आहे हे!
तिथे गेल्यावर बघितलं तर आमच्यासारखे अनेक कपल्स तिथे आले होते. सगळ्यांच्या चेहे-यावर उत्सुकता आणि आनंद दिसत होता. अनेक टायधारक इकडून तिकडे फिरत होते. त्यांच्या हातात ब-याचशा फाईल्स होत्या. आतमधे एक हॉलमधे बरेचसे टेबस मांडून ठेवलेले होते. वरवर पाहता ते एखाद्या रेस्टॉरंटसारखं वाटत होतं. आम्हाला एका टायवाल्याने आत नेलं आणि एका टेबलावर बसवलं. तोही आमच्यासमोर बसला.
"सर हे काय आहे तुम्हाला काही कल्पना आहे का? की आम्ही हे गिफ्ट का देत आहोत?" -टायवाला.
"हो. ही तुमची सेल्स प्रमोशनल ऑफर आहे!" -मी.
"बरोबर सर! तुम्ही आमच्या कंपनीचं नाव आधी कधी ऐकलं आहे का?"
"नाही!"
मग जवळजवळ अर्धा तास तो ही कंपनी कशी आंतरराष्ट्रीय आहे, जगभरात तिच्या किती शाखा आहेत हे गुणगान करत होता. त्याने आम्हाला बरेच प्रश्नही विचारले जसं तुम्हाला फिरायला आवडतं का? आतापर्यंत कुठेकुठे फिरला आहात? काय करता? वार्षिक उत्पन्न किती ?(इथे माझ्या भुवया मनातल्या मनात उंचवल्या गेल्या!) मग त्याने सांगितलं की ही कंपनी किती मोठी आहे, आम्ही तुम्हाला ह्या कंपनीची लाईफटाईम मेंबरशिप देऊ करतो आहोत. कालपर्यंत आम्ही दहा हजार कूपन्स वाटली आहेत. त्यातून आम्ही शंभर भाग्यवान विजेते निवडलेले आहेत. त्यात तुम्ही एक आहात. तर जर तुम्ही या क्लबचे मेंबर झालात तर आम्ही तुम्हाला ह्या ह्या सुविधा पुरवू. ह्या सुविधा जगभर आहेत. तुम्हाला आमच्याकडून सौना बाथ, जाकुझी आणि ब-याच काही सुविधा मोफत आहेत. असं बरंच बरंच काही त्याने सांगितलं. आणि अजून एक....
"यासाठी तुम्हाला इतके इतके पैसे भरावे लागतील. ते तुम्ही हप्त्यातही भरु शकता." ती रक्कम जवळजवळ दोनेक लाखांच्या घरात जात होती. आणि याच प्रश्नाची मी वाट बघत होतो की हा मुद्याचं कधी बोलतो!
मी त्याला म्हटलं,"एक प्रश्न विचारु?"
"विचारा."
"तुम्ही सौना बाथ घेतलाय कधी?"
"नाही. का?"
"त्यावाचून तुमचं काही अडलं का?"
"नाही!"
"मग माझं काय अडणार आहे? हे फक्त एक उदाहरण झालं. यातल्या किती गोष्टींचा आपल्याला खरंच गरज असते? आज मी जगभर, जगभर जाऊद्या भारतभर फिरायला कधी जाणार आहे, उद्या मी काय करणार आहे हेच मला माहीत नाही, तर मी या वर्षी, पुढच्या वर्षी कुठे फिरायला जाणार हे आत्ताच कसंकाय सांगू शकतो? मी रोज ऑफिसमधे येऊनजाऊन तीस किलोमीटर फिरतो. दर महिन्यातून एकदा माझ्या मूळ गावी जातो. ते इथून साडेचारशे किलोमीटर आहे, म्हणजे जाऊनयेऊन नऊशे किलोमीटर,अशा सरासरीने मी रोज जवळजवळ साठ किलोमीटर फिरतो. मग मला सांगा, इतकं रोज फिरल्यावर मी मला यावर्षी फिरायला अमुक अमुक ठिकाणी जायचंय असं ठरवू शकतो का? तुम्ही मला वर्षातून आठ वेळा समारंभासाठी हॉल फुकट वापरायला देऊ करताय, खरंच मी वर्षातून आठ समारंभ तिथे करणार आहे का? तुम्ही केले असते का? बरं त्या हॉलच्या व्यावसायिक वापराला तुमचा नकार आहे! मग मी हॉल घेऊन काय करु? पैसे म्हणाल तर तो प्रॉब्लेम मला नाहीचे! पण गरज वेगळी आणि हौस वेगळी!" यावर मात्र तो निरुत्तर झाला.
खरंच विकतच्या अशा सुखाची गरज असते का? मी जर उद्या अशा ट्रीपला गेलो आणि जर माझ्या डोक्यात हाच विषय असला की या महिन्याचा हप्ता मी कसा भरु, इतके पैसे तर आज माझ्याकडे नाहीयेत, तर मी त्या ट्रीपचा आनंद खरंच लूटू शकेन का? माझ्या उत्पन्नातला काही भाग मी मौजमजेवर जरुर खर्च करेन, पण किती, कुठे आणि केव्हा हे देखील मीच ठरवेन की नाही? आपण खूपदा गरजा विकत घेतो, त्याबदल्यात आपलं सुख, आपली मन:शांती आपण देऊन टाकत असतो. हा प्रसंग तर एक उदाहरण होता. असे अनेक मोह आयुष्यात येतच असतात. नि:संशय त्यांची स्कीम चांगली होती, पण मला तरी ती अनावश्यक वाटत होती. आज पैसे द्यायचे, ती स्कीम विकत घ्यायची, तिचा हप्ता मागे लावून घ्यायचा, कुणी सांगितली ही कटकट? मी क्रेडिट कार्ड वापरत नाही. त्याचे बरेच फायदे आहेत मला मान्य आहे, पण ते हातात आल्यावर आपलाच आपल्या खर्चावर लगाम राहील याची खात्री कुणी द्यावी?
आज संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर घरात जे घरपण जाणवतं ते मला बाहेर जाणवणार आहे का? मला ट्रीपला जायचं झालं तर मी जवळपास कुठेतरी दोनचार दिवसांकरता जाऊन येऊ शकतो. त्यासाठी मला ऋण काढून सण करण्याची अजिबात इच्छा नाही.
आपल्या गरजा आणि आपल्याला उपलब्ध होऊ शकणा-या सुविधा, यात कुठेतरी एक धूसर सीमारेषा असते. त्या सीमेवर आपला प्राधान्यक्रम लोंबकळत असतो. आपल्याला जर आपला प्राधान्यक्रम ठरवता आला तर जगण्यातले अर्धेअधिक प्रश्न सोपे होतील! तुम्हाला काय वाटतं?

शनिवार, २९ जानेवारी, २०११

ट्रॅव्हल्स

           पुण्यातून घरी जाण्यासाठी मला ट्रॅव्हल्स हाच एकमेव सोयीचा मार्ग आहे. कारण चारशे किलोमीटरचा प्रवास मी बसने तर नक्कीच नाही करु शकत! ऐनवेळी जाणं होत असल्याने ट्रेनचा प्रवासही शक्य नाहीये. शेवटचा पर्याय म्हणजे ट्रॅव्हल्स!

              तर गेल्या शुक्रवारी मी ट्रॅव्हल्सने घरी यायला निघालो आणि मला या ट्रॅव्हल्सवाल्यांच्या मनमानी कारभाराचा चांगलाच अनुभव आला.

             झालं काय की एकतर गाडी पाऊण तास उशिराने आली. बर ड्रायव्हर महाशयांनी वाकडेवाडीला एक तास उभी करुन ठेवली. जवळजवळ अकरा वाजता गाडी पुण्याबाहेर पडली. संध्याकाळी मला ऑफिसमधून यायला वेळ झाला होता म्हणून मी ढाब्यावर जेवण करायचं ठरवलं होतं. तर या ड्रायव्हर साहेबांनी साडेबारा वाजता ढाब्यावर गाडी उभी केली. तोपर्यंत भुकेने प्रचंड कासावीस झालो होतो. जळगावला पोचलो तेव्हा सकाळचे साडेसात वाजले होते. सकाळी सहाच्या आधी जळगावात पोचणारी गाडी इतक्या उशिराने पोचलेली पाहून ड्रायव्हर साहेबांच्या कूर्मगती ड्रायव्हिंगची कल्पना आलीच! जळगावला जवळजवळ सर्वच गाडी खाली झाली. आम्ही भुसावळला जाणारे फक्त नऊ जण उरलो होतो. सर्वांनी चला चलाचा गलका केल्यावर गाडी निघाली. तरी जळगावमध्ये एक तास मोडलाच!

              खरी कमाल तर यापुढेच झाली. जळगावच्या बाहेर गाडी आली न आली तोच आमच्या "सामर्थ्यशाली सारथ्याने" परत एकदा थांबवली! का म्हणून विचारलं तर म्हणे क्लिनर (यांच्या भाषेत किन्नर, आणि हा यक्ष!) गावात गेलाय, येईल पाच मिनिटात! पंधरा मिनिट झाले तरी त्याचा काही पत्ता नाही! लोक आरडाओरडा करायला लागले तर हा सरकारी कर्मचा-यांसारखा ढिम्म! अजून पाच मिनिटांनी एक ओम्नी येऊन थांबली. त्यातून "किन्नर" आणि त्या ओम्नीचा सारथी उतरले.(हा सारथी बहुतेक गंधर्व असावा! आमचे किन्नर साहेब त्याला आणायला गेले होते!).

’किन्नर’ साहेब म्हणाले,"चला सगळ्यांनी या गाडीत बसून घ्या!".
काही लोक लगेच बॅगा वगैरे घेऊन उतरायला लागले.
आता मात्र माझा संयम संपला! आणि त्या यक्ष आणि किन्नर जमातीबरोबर जरासा ’प्रेमळ’ संवाद घडला! तो असा:

मी: का? या ओम्नीने का जायचं?
किन्नर: साहेब नऊच लोक आहेत, त्यामुळे...
मी: मग काय झालं? आमच्याकडे भरपूर सामान आहे, त्याचं कसं करायचं? माझ्याकडेच पाच बॅग्स आहेत.
किन्नर: मी बसवतो ना बरोबर! तुम्ही काळजी करू नका साहेब!
मी: एका ओम्नीत नऊ लोक! सामानासुमानासकट! कसं शक्यय?
किन्नर: खरं सांगू का साहेब, आमच्या मालकांना एक लग्नाची ट्रीप मिळालीये जळगाव ते भुसावळ अशी! त्यामुळे...
मी: म्हणजे आम्ही इतके स्लीपरने येणारे मूर्ख आहोत का? आम्ही इतके पैसे का भरतो? प्रवास नीट व्हावा म्हणून ना? की तुमच्या मालकाला फक्त पैशाशी घेणंदेणं आहे! मला नंबर द्या त्यांचा! मी बोलतो त्यांच्याशी! (बाकीच्या प्रवाशांना) कुणीच जायचं नाही ओम्नीतून!
गंधर्व (ओम्नीचालक): साहेब नवी गाडीये आपली!
मी: एक मिनिट, तुम्ही मधे बोलू नका! नवी असो की जुनी, आम्हाला काहीही कर्तव्य नाहीये!
(आमच्या किन्नरला)हे बघा, तुमच्या मालकाला औरंगाबादहून ट्रीप मिळाली असती तर तिथून आम्हाला ओम्नीतून पाठवलं असतं का? आम्हाला काय मूर्ख समजलात का? तुम्ही आम्हाला भुसावळपर्यंत स्लीपरने पोचवण्यासाठी कमीटेड आहात. एकतर दुसरी ट्रॅव्हल्स आणा नाहीतर हीच गाडी भुसावळ पर्यंत घेऊन चला! नऊच प्रवासी आहेत तर त्याला आम्ही काय करणार! एकतर सकाळी सकाळी डोकं फिरवू नका! मला नंबर द्या मालकांचा!
किन्नर: जाऊ द्या साहेब, चला! (त्या ओम्नीवाल्याला) तू जा आता, तुझ्याशी नंतर बोलतो!
ओम्नीवाला: xxxxx xxxxxxxxx xxxxxxxx xxx
              गपगुमान त्याने गाडी भुसावळपर्यंत आणली!

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

असा तोल जाता कुणी सावरावे?

ठिकाण: आमची रोजचं चहाचं दुकान
वेळ: संध्याकाळची

तर हे दुकान म्हणजे एक कट्टाच आहे. तिथे नुसतं उभं राहिलं तरी अर्ध्या तासात किमान एक डझन मित्र भेटून जातात. संध्याकाळी तर दुकानासमोर गाडी लावायला जागा नसते. दुकानाचा मालक पोरगेलासाच आहे. राजस्थानी आहे. त्याने त्याच्या हाताखाली काम करायला काही मुलांना पण त्याच्या गावाकडून आणलेलं आहे.
... हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मी त्या दुकानात पाहत असलेला प्रसंग!
तर झालं काय, की काल संध्याकाळी तो एका कामगाराला मारत होता. जोरजोरात राजस्थानीत शिव्या देऊन तो त्याला नुस्ता जोरजोरात हाणत होता... आणि बाकीचं पब्लिक नुस्तं बघत होतं. दुरुन बघणा-याला वाटेल की किती या बिच्या-या कामगाराचे हाल आहेत! इतक्या लोकांसमोर मालक त्याला मारतोय! कुणी विचारलं तर त्याला म्हणत होता की तुम्ही मधे बोलू नका. तो कामगार बिचारा खाली मान घालून गप मार खात होता. शेवटी मालक मारुन मारुन थकला, बसला आणि म्हणाला, "काय सांगू साहेब, हे इथे बिड्या ओढतंय! मी इथे चहाबरोबर इतक्या सिगरेटी विकतो, पण कुणी माझ्या कुठल्या कामगाराला सिगारेट फुंकताना पाहिलंय का? कधी मला तरी पाहिलंय का? ह्या पोरांना त्यांचा आईबापांनी हे काहीतरी पुढे जातील, मोठे होतील म्हणून इथे इतक्या लांब माझ्या भरवश्यावर पाठवलंय! अन हे इथे येऊन हे धंदे करतायेत! यांच्या आईबापाला कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल? मी यांच्या पोराला बिघडवलं असं म्हणतील ते! माझं जाऊ द्या हो, त्याबद्दल पण काही नाही, पण हे चांगलंय का? आज बिड्या ओढतोय, उद्या दारूही पिईल! मग झालं ना आयुष्याचं मातेरं!"

त्याचा त्रागा ऐकून काही सज्जनांनी जनाची नाही पण मनाची बाळगून आपल्या हातातल्या धूम्रकांड्या पायाखाली चिरडल्या!

माझ्या मनात एक चित्र उभं राहील... डेव्हलपर सिगारेट पिऊन आला म्हणून पी.एम. त्याला मारतोय!.. क्षणभर हसूच आलं! कितीही विचार केला ना तरी असं शक्यचं नाहीये! त्या कामगाराला वाटलं नसेल का की एकदातरी विरोध करावा! पण त्याच्याजवळ काही कारणच नव्हतं! आपल्यासारख्या पांढरपेशांना जर कुणी हटकलं तर आपण म्हणणार.. "तुझ्या पैशाने पितो का? तू तुझं बघं! हा माझा पर्सनल प्रश्न आहे!" खरचं.. आपण जितके ग्लोबल होत जातो तितके संकुचितही होत जातो. कधी कधी वाटतं आपलं जर चुकलं तर आपल्यालाही असंच कुणीतरी मारावं... आईनंच! आपण जितके जितके मोठे होत जातोय ना तितके तितके एकटे होत जातोय. तो पोरगा सावरेलही, कुणी सांगावं? आपल्याला कोण सावरणार?

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

सप्त्या...


आमच्या गावाकडे ’सप्त्या’ हा एक खरंच छान कार्यक्रम असतो. ’सप्त्या’ म्हणजे ’भागवत सप्ताह’! त्याचा "सप्त्या" नेमका कधी झाला हे आमच्या आधीच्या तीन पिढ्यांनाही सांगता येणार नाही. पण झाला तो अपभ्रंश!

सर्वसाधारणपणे बरेच दिवसापासून गावात काही कार्यक्रम झालेला नसला,म्हणजे कुणाचं लग्न वगैरे, तेव्हा कुणाच्या तरी डोक्यातून सप्त्या बसवायची भन्नाट कल्पना निघते. किंवा ब-याचदा चातुर्मासात सप्त्या बसवला जातो. सप्त्या बसवायचा हेतू नि:संशय चांगला असतो की निदान त्यनिमित्ताने का होईना, पण देवाचं नामस्मरण व्हावं, चार चांगले शब्द कानावर पडावेत.. पण होतं काय, की सप्त्या शेवटी टिंगलीचा विषय ठरतो. आमच्या भागातले बहुतेक लोक वारकरी आहेत. दरवर्षी न चुकता वारीला जातात. कितीतरी ओव्या, अभंग त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांचा सप्त्या बसवण्यात पुढाकार असतो.

सप्त्याची सुरुवात एकदम मजेदार असते. आधी सप्त्याबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लागतात. त्यावर कोणता ’ब्वा’ बोलणार आहे त्यांचा मोठ्ठा फोटो असतो. खाली आयोजकांची नावं असतात. वेळ आणि पूर्ण कार्यक्रमपत्रिका दिलेली असते. ’ब्वा’ ही फार महत्वाची गोष्ट असते सप्त्यामधे! साधारणपणे आपण त्यांना महाराज वगैरे म्हणतो, पण आमच्याकडे सरळसरळ ’ब्वा’ म्हणतात! बरं ’ते ब्वा’ असं पण नाही, ’तो ब्वा’!

"कुढला व्बा हाय बे?"
"किशोर महाराज उचंदेकर!"
"आय ह्याय! येले कुढून पकडी आनला... तेले तं काहीबी बोलता नी येत! त्या तढी काय्बी बोली राहालता!"
"जाऊदेनं बे, लोकायले चाली राहाला ना, नं आपल्याले बी इतलंच परोडी राहालं. बाकीच्या ब्वाचे पैशे परोडतीन का आपल्याले?"
"हा भो ते बी बरोबरे!"
असले अगदी जनरल संवाद आहेत ’ब्वा’ च्या निवडीवर!
पहिल्या दिवशी मंडपात अगदी कुणीच नसतं. उगाच ब्वाला एकटं वाटू नाही म्हणून काही दोन-चार डोकी असतात तेव्हढीच! बाकीच्यांचं मत म्हणजे "जाऊनं बे, बारे पूरा हप्ता पडेले!".
मग दुस-या दिवसापासून ज्या ज्या घरात म्हातारी माणसं आहेत, त्यांना आंजारुन-गोंजारुन, समजवून, प्रसंगी त्यांच्या अंगावर खेकसून त्यांना ’सप्त्या’ला पाठवलं जातं. "आढी बशीसन काय करी राहाले, तढी जा सप्त्यात! तो ब्वा काय सांगी राहाला जरा ऐका! तितलंच देवाचं नाव घेनं व्हतं! आढी घरी बशीसन निस्ते डोकं खाता!" अशा ’प्रेमळ’ संवादांनी घरातल्या म्हाता-यांना मंडपात पाठवलं जातं. हजारात एखादा तरुण मंडपात दिसतो. बरेच जण तर शेवटच्या दिवसापर्यंत मंडपात फिरकत नाहीत.

’सप्त्या’ सेशन्समधे चालतो. सकाळी आधी भागवतग्रंथाची आरती होते. मग ’ब्वा’ निरुपणाला बसतात. भागवतातला एक श्लोक घेऊन ते त्याचा अर्थ सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत उलगडून सांगतात... ते बोलतांना कधीच हाय बाऊंसर शब्दांचा वापर करत नाहीत. लोकांमधले एक होऊन, त्यांना त्यांच्या भाषेत ते अर्थ सांगतात. करता करता जेवणाची वेळ होते. जेवण करुन आल्यावर परत संध्याकाळपर्यंत निरुपण चालतं. असं करत करत ’ब्वा’ बरोबर आठवडाभरात सगळा भागवत सांगून संपवतात.(शाळेचा पोर्शन पण इतक्या लवकर पूर्ण होत नाही! भागवत कसा काय संपतो तो देव जाणे!)

भागवत ऐकायला आलेल्या म्हाता-या बायका हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. कथेकडे त्यांचं लक्ष फक्त १ टक्का असतं. बाकी सर्व वेळ याच्यात्याच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात जातो. "तुले काय सांगू माय, मह्यी वाहारी अशी करी राहाली"! "आय ह्याय वं माय! मह्या ल्योक बी तिचंच आयकतो!" "ते अमुक अमुकचा डोया काहाडला तिले पाह्याले जानंय बारे!" असे संवाद! ’ब्वां’ना मग त्यांना परत परत ओढून कथेकडे परत आणावं लागतं. "बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल!" असा जोरात जयघोष करून ’ब्वा’ त्यांना परत कथेत आणतात. पाच मिनिट झाले, की परत यांचं सुरुच!
भागवताबद्दल आणि सांगणा-या ’ब्वा’ बद्दल नितांत आदर हे या बायकांचं वैशिष्ट्य! रोज कथेला येतांना त्या वाटीभर का होईना, पण शिधा घेऊनच येतात. आरती झाली, की भागवताला शिधा वाहिला जातो आणि भक्तिभावाने ’ब्वा’ च्या पायावर डोकं टेकवलं जातं. खरंच सांगतो, इतका आदर आणि इतका सन्मान मी अजून कुणालाच मिळालेला बघितला नाहीये!

करता करता भागवताचा शेवटचा दिवस जवळ येतो. आधीच वर्गणीप्रमाणे कुणी तूरडाळ दिलेली असते तर कुणी तूप, कुणी गहू देतं, कुणी भाजी स्पॉन्सर करतं. ज्या दिवशी भागवताचं पारणं असेल, त्याच्या आदल्या दिवशी गल्लीतल्या चक्कीवाल्याकडे गहू नेऊन दिला जातो. तो रात्रभरात तो दळून ठेवतो. सकाळी खेड्यावरुन भरताच्या वांग्यांचे पोते, मिरचीचं आणि आल्याचं पोतं,कांद्याची पात आणि केळीच्या पानांचे गठ्ठे येतात. सकाळी दळून आणलेला गहू , म्हणजे कणीक लोटगाडीवर लादून आपल्या विभागातला प्रत्येक घरात अडीच-तीन किलो कणीक पोचवली जाते. सकाळी ११ वाजायच्या आत घराघरातल्या बायका त्याच्या पोळ्या लाटून ठरलेल्या ठिकाणी, म्हणजे सप्ताहाच्या मंडपाजवळ कुणाच्यातरी घरात पोचवून देतात. काही लोक कणीक वाटायला गेलेले असतात तोपर्यंत १०-१२ लोक वांगे चिरायला बसतात. १०-१२ पोते वांगे चिरून त्याची "घोटेल भाजी" (घोटलेली भाजी) बनवली जाते. तिच्यात आलं, लसूण टाकलं जातं. भाजी इतकी घोटलेली असते की तिच्यात वांग्याची एक फोडही शिल्लक राहत नाही. पूर्वी लोक कमी होते तेव्हा मोठ्या रवीने हातानी भाजी घोटली जायची, पण आता जी रस्ता फोडायची ड्रील असते (जेसीबी ड्रील) तिच्या टोकाला मोठी रवी बांधून त्याने भाजी घोटतात. तोवर दुसरीकडे चुलीवर (खरंतर रहाडीवर, रहाड म्हणजे जमिनीवर एक चर खोदून त्यात लाकडे टाकतात व त्यावर विटा ठेवून त्याचा उपयोग चुलीसारखा करतात.) वरण शिजत असतं. जेवणाचा मेनू एकदम साधा म्हणजे, वरण-पोळी आणि ही वांग्याची घोटलेली भाजी असा असतो. क्वचित शिरापण केला जातो.भागवताच्या शेवटच्या आरतीला मात्र सगळेजण उपस्थित असतात. आरती झाली रे झाली, की लगेच सगळे जेवायला बसतात. हे जेवण जेवण्याची पण एक विशेष पद्धत आहे. केळीच्या पानावर पोळी बारीक कुस्करुन तिचं आळं केलं जातं त्यात वरुन वरण ओततात, वरण एकदम पातळ असतं.घट्ट वरण केलं तर ते नीट मिक्स होऊ शकत नाही.म्हणून वरण पातळच करतात. त्यावर भरपूर तूप ओततात. आणि ते मधलं मधलं कालवून खाल्लं जातं. जेवण पूर्ण होईपर्यंत आळं मोडलं जात नाही. आळयाच्या बाजूबाजूचं आत घेत जाऊन जेवण केलं जातं. या जेवणाला आमच्याकडे मजेने "कॉंक्रिट जेवण" पण म्हणतात. कारण जेवण झाल्यावर ते पोटात कॉंक्रिटसारखं घट्ट बसतं.इथल्या जेवणाला जी चव असते ती मी छातीठोकपणे सांगू शकतो जी जगातल्या कुठल्याही जेवणाला नसेल! काय त्या भाजीची अप्रतिम चव! कायम जिभेवर रेंगाळत असते! दुपारी बारा वाजेपासून सुरु झालेल्या पंगती चार-पाच वाजेपर्यंत सुरु असतात.लोकवस्तीप्रमाणे सरासरी चार-पाच हजार लोक भागवताचं दर्शन घेऊन आणि जेवून जातात.नव्वद टक्के लोक भागवताला आणि ’व्बा’ ला नमस्कार केल्याखेरीज जात नाहीत. हळूहळू उन्हं कलायला लागतात. ’ब्वां’ची निघण्याची लगबग सुरु होते. बिदागी घेऊन आणि सगळ्यांचा निरोप घेऊन ’व्बा’ निघून जातात. हळूहळू लोकही कमी व्हायला लागतात. वाढून वाढून दमलेले हात मग जेवायला बसतात. त्यांची पंगत संपते तोवर बाकीचे भांड्याकुंड्यांची आवराआवर करण्यात मग्न होतात. सगळयांची जेवणं झाली की दोन-चार जण तुरखाट्यांचा (तुरीच्या झाडाच्या काड्या) खराटा बनवतात, आणि परिसर झाडायाला सुरुवात करतात. पाणी मारुन जेवण झालेली जागा लख्ख केली जाते. पुढच्या ’सप्त्या’ची वाट पाहत एक मोठ्ठा अध्याय संपतो.

काही शब्दांचं स्पष्टीकरण:
आढी : इथे
तढी: तिथे
वाहारी : सून
डोया काहाडला : डोळ्याचं ऑपरेशन झालं.

सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

पुस्तकं



या विकांताला जरा निवांत होतो. म्हणजे ऑफिसमध्ये काही काम नव्हतं.(नाहीतर दर शनिवारी-रविवारी अस्मादिक ऑफिसमधे!). म्हटलं चला जरा आपल्या ब्लॉगबाळाकडे लक्ष देऊयात. खरंच माझं त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय. (असं माझ्या मुलांच्या बाबतीत मी भविष्यात केलं नाही म्हणजे मिळवली! नाहीतर आहेच, दमलेल्या बाबाची कहाणी!) मग जरा ब्लॉगच्या सजावटीकडे बघितलं. बरेच दिवस एखादं घर बंद असावं, आणि जर आपण त्या घरात आलो, तर त्या घराची जी अवस्था दिसते तसा माझा ब्लॉग दिसत होता. बरेच दिवस धूळ झटकायलाही वेळ मिळला नव्हता. मग काय, आंतरजालावर आधी आवडीची पुस्तकं शोधली. मला रसिक.कॉम ची साईट मिळाली. मग सुटलो सुसाट! एक एक करुन वाचलेली पुस्तकं आठवायला लागलो. जस आठवलं, तशी त्यासाठीची लिंक शोधली. ब-याच पुस्तकांची माहिती गोळा केली. त्यातली जी खरंच वाचनीय होती ती "मला भावलेली पुस्तकं" या सदरात लिहून टाकली.

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

पुन्हा मिशी.....

        काल गौरवची ही पोस्ट वाचली. म्हटलं चला आपण पण आपले मिशीचे किस्से शेअर करावेत.
मी फार पूर्वीपासून मिशी ठेवतो. अकरावी-बारावीत असतांना माझ्या मित्रांमधले बरेच जण मिशीची कोवळी रेघ ठेवायचे. (कारण त्या वयात तेवढीच यायची!) नंतर एकेकाच्या मिशा गायब व्हायला लागल्या. मी मात्र हट्टाने मोठी मिशी वाढवायचं ठरवलं होतं, माझ्या एका मामेभावाच्या मिशा त्याला कारणीभूत होत्या. त्याच्या मिशा इतक्या मोठ्या होत्या की आम्ही गमतीने म्हणत असू की तू दोन लेअरमधे आहेस, आधी मिशीचा लेअर आणि मग तुझा!तो चहा पीत असला की लिटरली चहा गाळला जायचा! तो न्हाव्याकडे दाढी करायला गेला की दोन लोकांच्या कटिंगला जितका वेळ लागेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ याच्या मिशा सेट करण्याकरता न्हाव्याला लागायचा, अजूनही लागतो.
          मी सिनिअर कॉलेजला गेलो तेव्हा जवळजवळ सगळे मित्र बिनामिशीचे! माझ्याही सगळे खूप मागे लागले की काढून टाक मिशी! पण मी कसला ऐकतोय! मग मित्रांनी मला भरीला पाडण्यासाठी बरेच प्रकार करून पाहिले, निरनिराळी आमिषं दाखवली, पण मी ढीम्म! मला म्हणे अरे तू मिशी ठेवली तर कुठलीही मुलगी तुझ्याशी लग्न करणार नाही! मी सांगितलं, मला अशा ’कुठल्याही’ मुलीशी लग्न करायचंच नाहीये. जिला मी मिशी ठेवलेली चालेल त्याच मुलीशी मी लग्न करेन. तिने जर आक्षेप घेतलाच तर सांगेन, की बाई गं, मी तुझ्याआधी माझ्या मिशीला ओळखतो. तुझी माझी ओळख तर आत्ता झाली!
एकदा तर कमालच झाली. कॉलेज सुटल्यावर आम्ही सगळे मित्र गप्पा करत उभे होतो. एकाच्या खिशात आगपेटी होती.(कशासाठी ते विचारू नका! सूज्ञास सांगणे न लगे!) त्याने आगपेटी काढली, काडी पेटवली, आम्हाला वाटलं नेहेमीसारखं, पण त्याने काय करावं, त्याने ती जळती काडी माझ्या मिशीवर ठेवून दिली! चर्रर्रर्ररर.... आवाज झाला. मला माझी मिशी जळेपर्यंत खरंच कळलं नाही. आणि कळेपर्यंत माझी एका बाजूची मिशी साफ जळून गेली होती. हाय रे दैवा! मग काय, मला उरलेलीही काढून टाकावी लागली! सगळे मित्र मला कितीतरी दिवस चिडवत होते, काढून दाखवली की नाही तुझी मिशी! तेव्हा मी पहिल्यांदाच मिशी काढली होती.
      माझा एक मित्र पण मिशी वाढवायच्या मागे लागला. त्याने मिशी वाढवली पण! पण त्यची मिशी म्हणजे ओठावर टाचण्या टोचल्यासारखी दिसायची! सगळे केस एकदम सरळ आणि एकदम दूरदूर! त्याला आम्ही ’लॉबस्टर’ म्हणायचो! शेवटी त्याने मिशीचा नाद सोडला!
      मी मोबाईल गेमिंगमध्ये असतांना एकदा एक मोठा प्रोजेक्ट आला होता. काम खूप होतं. तेव्हा मी जवळपास तीन महिने कटिंग आणि शेविंग केलं नव्हतं.केसांचा पार मकरंद देशपांडे झाला होता. प्रोजेक्ट संपवून गावी गेलो तर घरच्यांनी फक्त चहा घेण्यापुरतं मला घरात घेतलं आणि तसंच परत न्हाव्याकडे पिटाळलं! न्हाव्याने त्यादिवशी तीन लोकांची कटींग माझ्या एकट्याच्याच डोक्यावर केली! त्याला सांगितलं, "मिशीला हात लावायचा नाही! मी ती स्वत: घरी सेट करेन!". घरी आलो आणि मिशी सेट करण्यापूर्वी एक फोटो काढून घेतला! तोच हा फोटो!


शनिवार, ३ जुलै, २०१०

एक उनाड दिवस

परवा सकाळी नेहेमीप्रमाणे ऑफिसला गेलो. एक प्रॉब्लेम फिक्स करत असतानांच बॉसचा फोन आला.
"काय रे आज तुझा वाढदिवस आहे?"
"हो" - मी.
"मग काल बोलला नाहीस तू!"
"त्यात काय सांगायचं!"
"आत्ता सुट्टी घे,घरी जा! आज तुझा दिवस आहे! एन्जॉय!"
"खरंच?"
"अरे अगदी खरं! कामाचं आपण नंतर पाहू! जा तू!"
       स्तंभित, आश्चर्यचकित वगैरे वगैरे सगळी विशेषणं वापरून संपली माझी! अचानक सुट्टी? आत्ता प्रश्न पडला की या अंगावर आलेल्या सुट्टीचं काय करायचं? वीकएंडसाठी राखून ठेवलेली कामं आठवायला लागली. हे करू की ते करू! तस पाहिलं तर कुठल्याच कामाला वेळ पुरणार नव्हता! १२ वाजलेले होते, अर्धा दिवस तर असाच गेला! मग विचार केला, मरूदेत ती कामं, आज जगावा एक उनाड दिवस, आपलाच वाढदिवस...! किती दिवसात स्वत:करता जगलोच नाही आपण!
      सरळ घरी आलो. मित्रांना फोन करून उपयोग नव्हता. सगळे ऑफिसमधे! मग घरी असणा-या काही मित्रांना सोबत घेतलं आणि सरळ पुणे सेंट्रल गाठलं. म्हटलं चला विंडो शॉपिंग करुयात. चकचकीत मॉलमधल्या भपकेबाज वस्तू पहात हिंडत होतो. परवा १ तारीख होती! त्यामुळे मॉलमध्ये ही गर्दी! किती अनावश्यक वस्तू खरेदी करून घराचं गोडाऊन करून टाकतात लोक! मी विचार केला, यातल्या किती वस्तू घरात असायलाच हव्यात? उत्तर आलं, पन्नास टक्क्यापेक्षा नाही! काही अडत नाही या वस्तू घरात नसल्या तरी!
      तिथून परत आलो आणि घरी येऊन शांत बसून राहिलो. काहीही न करता, मनात कुठलाही विचार न आणता फक्त शांत बसून होतो. आजूबाजूची शांतता कानांनी टिपून घेत होतो. शांततेलाही स्वत:चा एक नाद असतो. आपण कधी ऐकतच नाही. योगी व्यक्ती ज्या समाधीबद्दल बोलतात ती बहुतेक हीच असावी. खडकातून झिरपणा-या पाण्यासारखी शांतता आत झिरपत होती. किती अद्भूत अनुभूती असते ती! कितीतरी वेळ मी त्याच अवस्थेत बसून होतो. मन निर्विचार होत होतं. खरंच खूप हलकं वाटलं. एकूण दिवस लक्षात राहण्यासारखा गेला.

गुरुवार, २४ जून, २०१०

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?

"तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं? "
संदिपचं हे गाणं त्यानं कुठल्या पोटतिडिकेने लिहिलंय हे तो आणि त्यात वर्णन केलेल्या प्रसंगाला तोंड देणारे समस्त बाबालोकच समजू शकतात. उगाच नाही प्रत्येक वेळेस ते गाणं ऐकलं की प्रत्येकाच्या पोटात तुटतं! पण त्या गाण्यातली परिस्थिती म्हणजे बापाची विवशता आहे, पिल्लाला वेळ देऊ शकत नसल्याची हूरहूर आहे,खंत आहे. आणि त्या बापाला वाटणारी भीतीसुद्धा रास्तच आहे. लहान मुलांना जर आईबापाचा सहवास मिळाला नाही तर ती त्यांच्यापासून मनाने दुरावतात. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण बापाला ही भीती वाटण्याचं अजून काही कारण असू शकतं का? हो! ही दुसरी बाजू मी पाहिली आहे.
           आमच्या ओळखीचं एक कुटुंब आहे. तसं सर्वार्थाने सुखी, सुस्थापित, चौकोनी वगैरे वगैरे! त्यांना एक मुलगा एक मुलगी. तीन-चार वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं. तिचा नवरा रेल्वेत नोकरीला आहे. सरकारी नोकरी म्हणजे आईवडिलांच्या भाषेत "मुलगी सुस्थळी पडली!". ती आणि तिचा नवरा नोकरीनिमित्त घरापासून लांब रहात होते. लग्नाच्या पहिल्या वर्षी सण-उत्सवांच्या निमित्ताने दोन्हीकडच्या आईवडिलांचं येणं-जाणं सुरु झालं. नंतर नंतर मात्र मुलीचे आईवडिल स्वत:चं घर सोडून मुलीकडे महिना महिना मुक्काम ठोकू लागले. आणि मग हळूहळू आईमधली सासू जागी झाली. छानपैकी मुलीचे कान भरणं चालू झालं."त्याचा पगार आधी ताब्यात घे! सासूसास-यांशी फटकून वाग! सासरच्या माणसांना जास्त येऊ देत जाऊ नकोस," वगैरे वगैरे! आणि मग वादाची ठिणगी पडली. थोडक्यात मुलीच्या संसारातला आईचा हस्तक्षेप वाढायला लागला.
           तिच्या नव-याला जरी कमी पगार असला तरी तो घर चालवण्यापुरते पैसे कमवतोय ना! तर आता त्यांना तो पगार कमी वाटायला लागला. मग पगारावरून जावयाचा पाण उतारा वगैरे वगैरे चालू झालं. यथावकाश त्यांना मुलगी झाली. ती दोन वर्षाची होईतो दुस-या मुलीचा जन्म झाला. मग काय, मुलीला दोन्ही मुलींना एकाच वेळेस सांभाळणं जमणार नाही म्हणून मुलीचे आईवडिल मोठया नातीला आपल्याकडे घेऊन आले. ती काय लहानच होती, त्यामुळे ती पटकन रुळली. नंतर नंतर तिला आईबापाची आठवण येईनाशी झाली. तिचे वडिल तिला भेटायला आले की ती त्यांच्याकडे अनोळखी नजरेनं पहायची. बापाचं काळीज तुटायचं. पण सासूसासरे "आमच्या मुलीची खूप धावपळ होईल", या सबबीखाली नातीला सोडायला तयार नव्हते! शेवटी तिचे वडिल भांडून भांडून तिला घेऊन गेले. कारण तिचा बापच तिच्यासाठी अनोळखी बनत चालला होता.
           त्यानं केलं ते बरोबर की चूक हा प्रश्नच आता उरत नाही! तो सर्वस्वी बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं?

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

धर्म करा अन चावडी चढा !

"धर्म करा अन चावडी चढा" अशी मराठीमधे एक म्हण आहे. थोडक्यात "आ बैल मुझे मार!".
माझ्या एका मावसभावाची भाची, म्हणजे वहिनींच्या बहिणीची मुलगी मुंबईत एका चांगल्या नावाजलेल्या चित्रकला महाविद्यालयात शिकते आहे. एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा तिची आई,म्हणजे वहिनींची बहिण म्हणाली की हिच्यासाठी वेब डिझायनिंगचं काही फ़्रीलान्स काम असेल तर सांगा. ती करून देईल. मी तिने काढलेले चित्र बघितले. खरंच अफलातून होते. म्हटलं ठीक आहे. मी बघतो.

दोन-चार दिवसांनी माझ्या एका मित्राचा फोन आला. त्याने एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु केलेली आहे. त्याला क्लायंटला एक डेमो द्यायचा होता. त्याने विचारलं की तुझ्या ओळखीचा कुणी फ्रीलान्स वेब डिझायनर आहे का? मी म्हटलं एक मुलगी आहे, तिला विचारून तुला सांगतो. मग मी या बाईसाहेबांना फोन केला. या काम करून द्यायला तयार झाल्या. मित्राने मला तिचे वर्क सँपल्स पाठवायला सांगितले. पुन्हा तिला फोन, पुन्हा याला फोन. माझा नुसता शटलकॉक झाला होता. बरं या मॅडमचा मोबईल नंबर त्याला द्यायला या नाखुष होत्या. त्यामुळे सगळं कम्युनिकेशन माझ्यामार्फत चाललं होतं. म्हटलं हेही ठीक सही! एकीकडे मित्र तर एकीकडे नातेवाईक! कुणालाच काही बोलू शकत नाही.नाहीतरी व.पुं.नी एका ठिकाणी म्हटलंच आहे,"त-हेवाईक या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे नातेवाईक!" मित्र रोज फोन करून विचारत होता की झालं का काम! या मॅडमचं काम ढिम्म हलायला तयार नाही. वरून त्यांच्या आईसाहेब आम्हाला विचारतात,"ते काम मेल करण्यासाठी तिला सायबर कॅफेमधे जावं लागतं, त्यात पैसे जातात. ते तुमचा मित्र देईल का ?" अरे! आम्ही जॉब शोधायचा असतो तेव्हा सायबर कॅफेमधे जातो ते पैसे काय आम्ही आमच्या कंपनीकडून वसूल करतो का? कमाल आहे! तरी मी मित्राला त्यासाठी तयार केलं.
शेवटी डेडलाईन अगदी जवळ आली आणि मित्र अन मी गॅसवर! मी बाईसाहेबांना फोन केला तर त्या फोन घ्यायला तयार नाहीत. नंतर तर फोन कट करताय. असला संताप झाला माझा! झेपत नसेल तर आधीच नाही सांगायचं, नाहीतर कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण करून द्यायचं हा साधा नियम यांना माहीत नाही का? मित्रासमोर तरी माझी सगळी विश्वासार्हता धुळीत मिळाली की नाही!
मग मी मित्राला सांगितलं की असं असं झालं. शेवटी त्याने ते काम एका दुस-या बॅक अप कडून पूर्ण करून घेतलं. नंतर नेहेमीच्या कामात मी ही घटना विसरून गेलो. नंतर एका दिवशी तिच्या आईचा मला फोन आला. "अहो आमचा कॉम्प्युटर बिघडला आहे. तुम्हाला वेळ असेल तर जरा येऊन बघता का? किंवा तुमच्या एखाद्या मित्राला तरी पाठवा!" म्हटलं हीच वेळ आहे सव्याज परतफेड करण्याची! हान सावळ्या! त्यांना म्हटलं, "अहो मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मला आणि माझ्या कुठल्याच मित्राला हार्डवेअर मधलं काहीच कळत नाही. मुंबईत लाखाने हार्डवेअर इंजिनिअर्स पडलेत. त्यांना विचारा! आणि आता मी तुमचा फोन कट करू शकतो किंवा मी उचलला नसता तर! माझ्यात सौजन्य अजूनही बाकी आहे आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेताहात! तुमचं काम वेळेत न पोचल्याने क्लायंटने मला पाचशे रुपये फाईन केला! ते कोण भरणार? तुम्ही नेटच्या खर्चाची गोष्ट करत होतात आणि इथे मला विनाकारण भुर्दंड बसला तो वेगळाच! परत त्या क्लायंटशी माझे व्यावसायिक संबंध खराब झाले ते वेगळंच! इतकं होऊनही तुम्ही माझ्याकडून मदतीची अपेक्षा कशी करू शकता? मला गेलेल्या पैशांचं दु:ख नाही, पण मनस्ताप किती झाला! निव्वळ तुम्ही वहिनींची बहिण आहात म्हणून मी काही बोललो नाही!"
इतकं फायरिंग ऐकल्यावर बाईसाहेब गुपचुप! मुळात त्यांनी माझ्याकडून असल्या फायरिंगची अपेक्षाच केली नसावी! अरे! तुम्ही मला गृहीत कसं काय धरता? तुमचा मुलगासुद्धा तुम्हाला त्याला गृहीत धरू देत नाही, मग माझाकडून ही अपेक्षा का?
त्यांनी गुपचुप फोन बंद केला! मग मी भावाला फोन करून सगळं सांगितलं. तो म्हणाला बरं झालं तू बोललास ते! आता कुणाबरोबरही असं वागतांना ते दहादा विचार करतील.

शेवट काय, तर "धर्म करा अन चावडी चढा !"

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

गणपती बाप्पा मोरया!!

काल थेऊरला जाऊन आलो. ब-याच दिवसांपासून चाललं होतं जाऊ जाऊ म्हणून! म्हटलं चला, आजच जाऊ! तसं आमच्या मित्रमंडळीना थेऊरचं काही अप्रूप नाही. रविवार असल्याने सगळे जरा आळसावलेलेच होतो. शेवटी माझा एक मित्र प्रशांत आणि मी असे दोघेच निघालो. मी सकाळी लवकरच माझी सकाळची क्लासची बॅच आटोपून घेतली आणि मग निघालो. पी.एम.पी.एम.एल. ने स्वारगेट ते थेऊर बस बंद केलीय. कारण काय ते त्या चिंतामणीलाच ठाऊक! मग सांगवी ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर थेऊर असे पोचलो. सव्वाअकराला मंदिरात पोचलो. वाटलं, आज रविवार आहे आणि त्यातून गणेश जयंती जवळच आली आहे, त्यामुळे मंदिरात ही... गर्दी असेल. पण सुदैवाने तसं काही नव्हतं.एक आजी काही लोकांना घेऊन सभामंडपात अथर्वशीर्ष म्हणत होत्या. गाभा-यात "श्रीं" ना अभिषेक चालू होता. अतिशय प्रसन्न वाटत होतं.
मी पण त्या लोकांमध्ये सामील होऊन अथर्वशीर्ष म्हणू लागलो. आणि खरंच सांगतो, इतकं शांत वाटलं ना, मनावरचा सगळा ताण, सगळं टेन्शन दूर होऊन गेलं. अथर्वशीर्षाच्या त्या धीरगंभीर पठणाने, मन अंतर्बाह्य ताजंतवानं झालं. तसं माझं आणि थेऊरच्या गणपतीबाप्पाचं जुनं सख्य आहे. का कोण जाणे, पण मला इथे येऊन माझा कुणीतरी जुना सुहृद भेटल्यासारखं वाटतं.माझं बाप्पाकडे काहीही मागणं नसतं, काही गा-हाणं नसतं. मनातले सगळे प्रश्न मनातच विरघळून जातात. काल वाटलं, बाप्पा विचारतोय, "काय रे, ब-याच दिवसात आला नाहीस?" मनातच म्हणालो, "बाप्पा, तुम्ही बोलवाल तेव्हाच येणं जमतं. इथून उर्जेचं च्यवनप्राश घेऊन जातो. ते मला कायम सोबत करतं." बाप्पा म्हणाले,"अरे यावं मधून मधून! पोरं घरी आली तर आईबापाला कोण आनंद होतो. तुला अजून काय कळणार म्हणा! " अर्थातच आमचा हा संवाद मनातल्या मनातच चालला होता. पण काल मला बाप्पा खूप आनंदी दिसले. कुणास ठाऊक!
मंदिरातून निघून आम्ही वॄंदावनात गेलो, जिथे रमाबाई पेशवे सती गेल्या. तिथे एक चिरंतन शांतता वसतेय. मी निव्वळ ती शांतता अनुभवण्यासाठी तिथे जाऊन बसतो.ती शांतता केवळ पिऊन टाकावीशी वाटते. तिथे मन आपोआप शांत होतं. बाप्पांचं मंदिर आणि वृंदावन, ही दोन ठिकाणं मला चैतन्य देतात.
तुम्हीही अनुभव घेऊन पहा!
गणपती बाप्पा मोरया!!

शनिवार, ९ मे, २००९

मुंबईची सुरक्षा..... किती पक्की?

मी काल संध्याकाळी मुंबई सेंट्रल स्टेशनवर उतरून घरी चाललो होतो. तेव्हा मी जे दृश्य पाहिलं ते म्हणजे मुंबईची सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण!
मुंबई सेंट्रलच्या प्रवेशद्वाराशी काही पोलिस स्टेनगन घेऊन बसलेले असतात. २६/११ च्या हल्ल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था सर्वच स्टेशनांमधे करण्यात आलीये.
तर झालं काय, की एक टेक्सी आली. तिच्या टपावर बरंच सामान होतं. तिथल्या पोलिसाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. टेक्सीतल्या माणसाने "साब बहुत जल्दी है!" असं ओरडत दहाची नोट पुढं केली. आणि या पोलिसाने अक्षरश: धावत जाऊन ती नोट घेतली आणि त्यांना डायरेक्ट जाऊ दिलं. हे सगळं एका क्षणात घडलं. वा रे मुंबईची सुरक्षा! मग अतिरेकी मुंबईत घुसले त्यात नवल काय?