स्वैर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्वैर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ जुलै, २०१०

स्वामनिष्टेपि कुरुते परहानि खलो ध्रुवम...

        शीर्षक वाचून एकदम गोंधळात पडला असाल ना? नाही नाही.. माझा संस्कृतात लिहिण्याचा कुठलाही विचार नाहीये! इतकं संस्कृत मला नक्कीच येत नाही. आज दोन बैराग्यांची ही झेनकथा वाचली आणि शाळेत असतांना संस्कृतच्या पुस्तकातला एक धडा आठवला, खरं तर ती गोष्ट होती. या दोन्ही कथांमधे केवळ "दोन बैरागी" इतकंच साम्य आहे.
          "स्वामनिष्टेपि कुरुते परहानि खलो ध्रुवम... " चा अर्थ आहे "दुस-याचं वाईट करतांना आपलं पण थोडंफार नुकसान होतंच!"
         होतं काय, की एका आश्रमात दोन साधू रहात असतात, सुबुद्धी आणि दुर्बुद्धी! दोघांचं एकदम विळ्याभोपळ्याचं नातं असतं. एकदा ते तपश्चर्येला बसतात. दिवस, महिने, वर्ष निघून जातात तरी त्यांची तपश्चर्या सुरुच असते. शेवटी एकदाचे देव प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देतात आणि वर मागायला सांगतात. (इथपर्यंत अशा सगळ्या गोष्टी कॉमनच असतात!)
      तर देव त्यांना तीन वर मागण्याचं वरदान देतात पण एक अट घालतात... "जो कोणी आधी जे मागेल ते दुस-याला न मागता दुप्पट मिळेल!" झालं... दोघंही विचार करतात काय मागावं? बरं जो आधी मागेल त्याला नंतर मागणा-यापेक्षा निम्मंच मिळणार असतं. असा बराच वेळ निघून जातो. देव म्हणतात "अरे मूर्खांनो मागा पटकन नाहीतर मी चाललो!"
         शेवटी दुर्बुद्धी म्हणतो,"देवा माझा एक पाय तोड,एक हात तोड आणि मला एका डोळ्याने आंधळा कर".
"तथास्तू!"
    आता दुर्बुद्धी एका डोळ्याने आंधळा होतो, त्याचा एक हात आणि एक पाय जातो.......... आणि सुबुद्धीचे दोन्ही हातपाय आणि दोन्ही डोळे जातात...
           म्हणजे काय तर सुबुद्धीला अपंग बनवण्यासाठी दुर्बुद्धी स्वत:च्या एका हातापायाचा आणि एका डोळ्याचा बळी देतो. हा या सुभाषिताचा सारांश आहे.

शनिवार, १० जुलै, २०१०

बनवाबनवी

"बंडू, बाळ तू मोठेपणी कोण बनणार?"
"मी किनई हे... बनणार! मी किनई ते... बनणार!"..... यादी संपतच नाही! सगळे हीच उत्तरं देतात. स्थलकालपरत्वे थोडाफार फरक पडतही असेल, पण एकूण साचा तोच! माझाही प्रकार काही वेगळा नव्हता. मला त्या वयात पोलिस इन्स्पेक्टरचं भयंकर आकर्षण होतं. कदाचित अमिताभ इफेक्ट असावा. मला तेव्हा मोठेपणी पोलिस इन्स्पेक्टर बनायचं होतं. तेव्हाचे हिरो पोलिस असलेले पिक्चर मी अगदी मन लावून बघत असे. एकदा असाच एक पिक्चर बघून आलो आणि शाळेत मधल्या सुट्टीत चोर-पोलिस खेळत होतो. माझ्या अंगात एकदम काल पाहिलेला पोलिस इन्स्पेक्टर संचारला. झालं.... मी पोरांना मारायच्या ऐवेजी त्यांनीच मला बुकलून काढला! असो. थोडं विषयांतर होतयं.
तर आपण बनणार कोण हा प्रश्न आहे. म्हणजे कालही होता आणि उद्याही असणार आहे. त्या निरागस वयात आपण फार मोठीमोठी स्वप्न रचत असतो. आपण वाकवू तशी परिस्थिती वाकत नाही हे भान त्या भाबड्या वयात नसतं. होता होता शाळेचे दिवस मागे पडतात. करिअर निवडायची वेळ येते. मग खरा प्रश्न सुरू होतो, कि आपण नक्की कोण बनणार? बनवाबनवीला तिथूनच सुरुवात होते.
आधी कागदपत्रांसाठी संबंधित यंत्रणा आपल्याला ’बनवते’. आपणही सगळं माहीत असूनही ’बनतो’. कारण "अडला नारायण...."! मग ऍडमिशन (सध्या लष्कराच्या एखाद्या मिशनसारखं झालंय!) तिथे कॉलेज आणि विद्यापीठ जसेजसे बनवत जातील तसेतसे आपण बनत जातो. नंतर नोकरीसाठी परत बनवाबनवी. कधी आपण करतो तर कधी संस्था! आयुष्याचा प्रत्येक पायरीवर ही बनवाबनवी आपल्या बरोबरीनं चालत असते. कुणाला कवी बनायचं असतं, तो कविता विसरून रात्री गस्त घालत फिरत असतो. एखादा चांगला गायक बिल्डिंगला सिमेंट किती लागेल, विटा किती लागतील याचा हिशोब मांडत बसलेला असतो. एखादा फक्त नशिबाला दोष देत फिरतो.
पण आपण आयुष्यात काहीतरी ’बनतो’ ती आपल्याला कुणीतरी काहीतरी ’बनवल्यामुळेच’!

मंगळवार, ६ जुलै, २०१०

जखम मांडीला अन मलम शेंडीला

कालचा "भारत बंद" म्हणजे जखम मांडीला अन मलम शेंडीला अशी गत आहे! इंधन दरवाढीचा निषेध म्हणून जरी हा बंद पुकारलेला असला तरी हे काही मूळ समस्येवरचं उत्तर होऊ शकत नाही. या बंदने सरकारला जाग येऊन ते दरवाढ मागे घेतील ही स्वत:चीच फसवणूक आहे.आणि सरकारला जाग यायला सरकार काही झोपलेलं नाहीये! ते जागं आहे आणि सामान्य जनतेला अजून कसं मूर्ख बनवता येईल याचा प्लॅन बनवतंय. त्याने कान बंद करून घेतलेले आहेत. त्यामुळे कितीही आरडाओरडा करा, त्याला काहीही फरक पडणार नाहीये! यात शेवटी नुकसान सामान्य जनतेचच झालंय.
      काल बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला. आज कित्येक घरात आज कमाई झाली नाही तर जेवणार काय अशी परिस्थिती आहे. त्यांचं काय? अत्यावश्यक सेवा जसं हॉस्पिटल, टिफिन या पूर्णपणे कोलमडल्या. सार्वजनिक मालमत्ता जसं एस.टी., तिचं किती नुकसान झालंय! देश चालवायला प्रत्येक मिनिटाला किती रुपयांचा खर्च येतो हे जर यांनी बघितलं तर यांचे डोळे पांढरे होतील. तब्बल १३००० कोटींचा चुराडा झालाय काल! हा पैसा सरकार कुठून वसूल करणार आहे? तुमच्या-आमच्या खिशातूनच ना! सामान्य माणसाला चलनवाढ, फुगवटा वगैरे तांत्रिक शब्दांशी काहीही घेणंदेणं नाहीये! त्याला त्याचा राहणीमानाचा स्तर कसा उंचावता येईल हे हवंय. की आयुष्यभर त्यानं ठिगळं लावत बसायचं? अरे बंद हा काय वाढत्या महागाईवर सरकारला कृती करायला भाग पाडायचा उपाय आहे का? इतके दिवस निषेधाच्या गुळण्या केल्या, आता बंदची उलटी! काय उपयोग?

शुक्रवार, ४ जून, २०१०

हर फिक्र को धूए मे उडाता चला गया....

"मैं जिन्दगीका साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुए मे उडाता चला गया...."
हे गाणं आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. पण यातल्या नायकाचं अनुकरण आपण करायचं का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सिगरेट पिणा-यांना ती कशी आणि कधी संपली आणि दुसरी कधी पेटवली हे लक्षातसुद्धा येत नाही. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया बनते जसं की गाडी चालवतांना आपण गिअर बदलणे, ब्रेक लावणे हे लक्षात न ठेवता करतो.
पण यात शरीराची किती हानी होते हे त्यांना कळत नाही. कितीही कानीकपाळी ओरडा, परत जैसे थे...
मला एक व्हिडिओ मिळालाय.. त्याचा दुवा इथे जोडतोय. बघूया सिगरेट पिणा-यांवर याचा काही विधायक परिणाम होतो का!
हा तो दुवा...

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

भन्नाट आर्टीस्ट

माझा एक मित्र ग्राफिक्स आर्टिस्ट आहे. कसली भन्नाट कला आहे त्याच्या हातात! एकदम रापचिक, एकदम चाबूक, एकदम फंडू. त्याच्या पेंटींगचा हा नमुना बघा!





त्याचा ब्लॉग आहे: http://yogeshron.blogspot.com/

सोमवार, १६ नोव्हेंबर, २००९

हुश्श......... ! सुटलो एकदाचे!

हुश्श......... ! सुटलो एकदाचे!
कायम आपल्या देशाकडून आणि आपल्या राज्याच्या संघाकडून खेळणा-या खेळाडूला जर
एकदम नवीन अनोळखी ठिकाणी खेळायला पाठवलं, तर त्याला जसं वाटेल, तो जसा
आपल्या सहका-यांपासून दुरावेल, तसंच काहीसं मला गेल्या दोन वर्षांपासून वाटत होतं.
आणि त्याला परत home ground वर खेळायची संधी मिळाली तर तो ती जशी जिवाच्या
आकांताने मिळवण्याचा प्रयत्न करेल, तसाच मी केला.

आलो एकदाचा home ground वर! BACK TO PUNE FROM MUMBAI! हुSSSSर्रे!
आता वर स्वच्छ आभाळ आणि समोर स्पष्ट रस्ता आहे...
येणारा प्रत्येक दिवस आता माझा असेल...
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश!

मंगळवार, १० नोव्हेंबर, २००९

जय महाराष्ट्र!

मस्त! एकदम मस्त झालं काल विधानसभेत जे झालं! मराठीच्या मुद्द्यासाठी शांततामय मार्गाने निदर्शनं करण्याचा पर्याय आता संपला आहे. आता फक्त 'ऐकता की जाता?' हेच करावं लागणार आहे. -जय महाराष्ट्र

सोमवार, ९ नोव्हेंबर, २००९

चेंज

आज खूप दिवसांनी ब्लॉग अपडेट करतोय. जवळजवळ तीन महिन्यांपासून मी मॅक ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करत होतो, आणि कामही खूप होतं. त्यामुळे त्यावर मराठी टाईप कसं करायचं हे शोधायला पण वेळ मिळत नव्ह्ता. ....पण आत्ता...एक मोठ्ठा ,निदान माझापुरता तरी.. चेंज येतोय.... काय तो कळेल लवकरच! त्यानंतर मात्र मी नियमीत ब्लॉग अपडेट करणार आहे. 
... तेव्हा, यापुढे नियमीत भेटू!