मंगळवार, ६ जुलै, २०१०

जखम मांडीला अन मलम शेंडीला

कालचा "भारत बंद" म्हणजे जखम मांडीला अन मलम शेंडीला अशी गत आहे! इंधन दरवाढीचा निषेध म्हणून जरी हा बंद पुकारलेला असला तरी हे काही मूळ समस्येवरचं उत्तर होऊ शकत नाही. या बंदने सरकारला जाग येऊन ते दरवाढ मागे घेतील ही स्वत:चीच फसवणूक आहे.आणि सरकारला जाग यायला सरकार काही झोपलेलं नाहीये! ते जागं आहे आणि सामान्य जनतेला अजून कसं मूर्ख बनवता येईल याचा प्लॅन बनवतंय. त्याने कान बंद करून घेतलेले आहेत. त्यामुळे कितीही आरडाओरडा करा, त्याला काहीही फरक पडणार नाहीये! यात शेवटी नुकसान सामान्य जनतेचच झालंय.
      काल बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला. आज कित्येक घरात आज कमाई झाली नाही तर जेवणार काय अशी परिस्थिती आहे. त्यांचं काय? अत्यावश्यक सेवा जसं हॉस्पिटल, टिफिन या पूर्णपणे कोलमडल्या. सार्वजनिक मालमत्ता जसं एस.टी., तिचं किती नुकसान झालंय! देश चालवायला प्रत्येक मिनिटाला किती रुपयांचा खर्च येतो हे जर यांनी बघितलं तर यांचे डोळे पांढरे होतील. तब्बल १३००० कोटींचा चुराडा झालाय काल! हा पैसा सरकार कुठून वसूल करणार आहे? तुमच्या-आमच्या खिशातूनच ना! सामान्य माणसाला चलनवाढ, फुगवटा वगैरे तांत्रिक शब्दांशी काहीही घेणंदेणं नाहीये! त्याला त्याचा राहणीमानाचा स्तर कसा उंचावता येईल हे हवंय. की आयुष्यभर त्यानं ठिगळं लावत बसायचं? अरे बंद हा काय वाढत्या महागाईवर सरकारला कृती करायला भाग पाडायचा उपाय आहे का? इतके दिवस निषेधाच्या गुळण्या केल्या, आता बंदची उलटी! काय उपयोग?

1 comments:

Unknown म्हणाले...

जखम मांडीला आणि मलम शेंडीला
----------------------
चे मराठवाडी भावंड-

म्हशीला दुखणे आणि पखालीला** इंजेक्शन!

पखाल: म्हशीवरून वाहाण्यासाठी वापली जाणारी कातडी बॅग.

टिप्पणी पोस्ट करा