सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

तळेगाव गणपती-शिरगाव-देहू

               आठ दिवसांपूर्वी सहज ’चेहेरापुस्तिका’ (फेसबुक) चाळत बसलो होतो. एका मित्राने त्याचा एका मोठ्ठ्या गणपतीजवळचा फोटो डकवला होता. मस्त ठिकाण वाटत होतं, म्हणून त्याला विचारलं की हे ठिकाण कुठलं आहे? त्याने सांगितलं, हा तळेगावजवळचा ’उघडा गणपती’! रस्त्यावरच आहे! झालं! ठरवून टाकलं, हा शनिवार या सत्कारणी लावायचाच! हा गणपती पुण्याहून मुंबईला जाताना रस्त्यावरुन दिसतो, रेल्वेमधूनही आणि रस्त्याने जातानाही!


                शनिवारी सकाळी लवकरच पुण्याहून निघालो. मुंबई-पुणे हायवेला लागलो आणि अर्ध्या तासातच सोमाटणे फाटा पार करुन गणपतीच्या पायथ्याशी पोचलो. शनिवार असल्याने मुंबई-पुणे हायवेला फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे अगदी रमतगमत गाडी चालवूनही अर्ध्या तासात पोचता आलं. पायथ्याशी गाडी पार्क करुन पाय-या चढून वर आलो. सकाळचे पावणेदहा- दहा वाजत होते, त्यामुळे तिथेही गर्दी नव्हतीच. आरामशीर दर्शन झालं. दोन-चार लोक दर्शनाला आले होते. सकाळ असली तरी पितृपक्षाचं ऊन पायाला चटके देत होतं. तिथल्या सिक्युरिटी गार्डकडूनच आमचे फोटो काढून घेतले. वरुन अवतीभवतीचा परिसर खूप छान दिसत होता. नुकताच पावसाळा संपल्याने सगळीकडे हिरवंगार गवत उगवलेलं होतं. त्या गवतात काही छोटी छोटी फुलंही उलमलेली होती. एकंदर मस्त मूड बनवणारं वातावरण होतं. खूप दिवसांनी असं मस्त "फ्रिक आऊट" वाटत होतं. रोजरोजच्या त्याच त्या कामाला उबगून गेल्यावर अशा ठिकाणी मस्त एनर्जी मिळते. आज हा एकदम स्वत: बाहेर जायला कसा तयार झाला या विचाराने बायकोही आश्चर्यचकित झाली होती!

                      (रस्त्यावरुन दिसणारा हिरवागार डोंगर)

                               तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं की इथून शिरगाव, ज्याला प्रतिशिर्डी म्हणतात ते किती लांब आहे? तिथून शिरगाव फक्त दोनच किलोमिटर होतं. मग काय! चलो शिरगाव! शिरगावला पोचलो. साईमंदिरात फार गर्दी नव्हती. छान दर्शन झालं. तितक्यात बायकोला चिंचांची कॅंडी विकणारा माणूस दिसला! मग काय! "अहो....!!!" कँडी घेतल्या. तिथून परतीच्या प्रवासाला लागलो.




               गणपतीला जाताजाता रस्त्याच्या उजव्या बाजूला आधीच देहू फाटा बघितला होता. बायकोला म्हटलं, काय जायचं का देहूला? ती म्हणे चला! मग तिथून देहू! देहूमधे शिरल्याशिरल्या तिथलं वातावरण बघून आपोआप अंगात वारकरी शिरला! आहाहा... काय मस्त वाटतं सांगू! विठ्ठल मंदिरात दर्शनाला गेलो तो हातातली फुलं आणि तुळशी तिथल्या पुजा-याच्या हातात दिली. पुजारी म्हणाला, "अहो वाहा ना तुम्हीच!" खरंच छान वाटलं. आपण नेहेमी जेव्हा इतर मंदिरात जातो तेव्हा पुजारी आपल्या हातातून खसकन पूजासाहित्य ओढून घेतात आणि एक प्रसादाचा दाणा हातावर टेकवून पुढे ढकलून देतात. मी इथेही हीच अपेक्षा केली होती. पण इथे आम्हाला स्वत:च्या हाताने विठ्ठलाची पूजा करायला मिळाली. नेमकं कसं वाटलं नाही सांगता येणार, पण खूप अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं. योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती. ठरवूनही एकादशीच्या दिवशी मंदिरात न जाणारा मी, त्या दिवशी कसाकाय देहूत पोचलो देव जाणे!
                देहूवरुन निघालो तो न थांबता सरळ घरी! फक्त तीन तासात आम्ही तीन ठिकाणी फिरुन आलो. आता ही एनर्जी बरेच दिवस पुरेल! परत डाऊन वाटायला लागलं की परत असंच एखादं ठिकाण एनर्जीसाठी!

2 comments:

टिप्पणी पोस्ट करा