रविवार, ११ सप्टेंबर, २०११

मीमराठी.नेट कविता स्पर्धा (द्वितीय क्रमांक) कविता

        १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
       काल दिनांक १०/९/२०११ रोजी जाहीर झालेल्या निकालात माझ्या खालील कवितेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

       कधीतरी लहर लागली म्हणून चार ओळी खरडणा-या, साहित्याचा आणि व्यवसायाचा दुरान्वयेही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या एका साध्या माणसाला या निकालाने एक नविन आत्मविश्वास दिला आहे, त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी मीमराठी.नेटचे संचालक श्री. राज जैन, माझा उत्साह वाढवणारे मायबाप वाचक आणि परिक्षक श्री. प्रदीपजी निफाडकर यांचा मनापासून आभारी आहे.

               खूप झालं!

मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं!
                तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
                पण एकदम आवडलीस, खूप झालं!
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं!
                नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
                दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं!
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं!
                तुला नाही समजली माझी कविता? चालेल!
                हिशोब समजतोय ना? खूप झालं!
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं!
                -आदित्य चंद्रशेखर

-पूर्वप्रकाशित: http://mimarathi.net/node/6228

1 comments:

अनामित म्हणाले...

कविता फार आवडली. आपल्या नावसकट ही कविता माझ्या या ब्लॉगवर टाकायची इच्छा आहे. परवानगी मिळावी.



सुजित बालवडकर

टिप्पणी पोस्ट करा