गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ६)

दुस-या दिवसापासून राहुल्या आणि सम्या एकमेकांना पाठीमागे शिव्या द्यायला लागले. कुणालाच कळत नव्हतं की हा ग्रुप असा का वागतोय, कालपरवापर्यंत गळ्यात गळे घालून फिरणारे आज एकदम एकमेकांचं तोंडही बघायला तयार नाहीयेत... हे काय गौडबंगाल आहे? पण असं चाललं होतं खरं! आता सम्या आणि सुहास, राहुल्या आणि नेहा अन बाकीची मुलं असे सरळसरळ तीन ग्रुप पडले होते.
      .. पण रोज रात्री सम्या, राहुल्या आणि मंडळी भेटतच होती आणि आज काय काय घडलं त्याचे अपडेट्स घेत होती आणि दुस-या दिवशीचे प्लॅन्स ठरवत होती.
असाच आठवडा गेला. रोज मिळणा-या माहीतीचं विश्लेषण करुन,सगळ्या शक्यता आणि गॄहितकं लक्षात घेऊन ते या निष्कर्षापर्यंत आले की हे इंटर्नलचे क्वेश्चन पेपर्स फुटले आहेत आणि वर्गातल्या मोजक्या मंडळींकडे ते आहेत. ते आपल्याला हवेत की नको हा मुद्दाच आतापर्यंत चर्चेत आला नव्हता!
पण त्या दिवशी रात्री रव्या म्हणाला,

"राहुल्या, ते पेपर्स आपल्याला हवेत!"

"का? आपल्याला कन्फर्म माहीत आहे का की तेच पेपर्स आहेत? अरे आपल्याला जर अशी खात्री झाली ना की तेच पेपर्स आहेत तर आपण फक्त त्याचाच अभ्यास करु, बाकीचा काहीच अभ्यास करणार नाही! कशावरुन आपल्याला कुणकुण लागली आहे ते सुहासने काळे सरांना सांगितलं नसेल? कशावरुन काळे सर शेवटच्या क्षणी पेपर्स बदलणार नाहीत? आता हे नको सांगूस की सुहास मागच्या वेळीही तसाच टॉपर आला. आणि समजा मागच्या वेळी असाच किस्सा असला तरी आपल्याला कुणकुण नव्हती. अरे बाकीच्या पब्लिकला धूर दिसतोय म्हणजे आग असणारच कुठेतरी! यावेळेस ऐनवेळी क्वेश्चन पेपर्स बदलण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तुला काय वाटतं, काळे सरांना काहीच कल्पना नसेल? अरे, महा पाताळयंत्री माणूस आहे तो! कुठलंही खोटं कारण काढून ते आपलं करिअर बरबाद करु शकतात. केली खोटी कॉपी केस आपल्या सगळ्यांवर मग? त्यांच्या उपद्व्यापामुळं समजा आपल्याला भरारी पथकानं डिबार केलं, काय करशील? झाला ना एका मोहापायी आयुष्याचा सत्यानाश? आपल्याला काय सिद्ध करायचंय? आम्ही यांच्या पुढे जाऊ शकतो हे? ही स्पर्धा डबक्यातल्या बेडकांची स्पर्धा आहे असं नाही वाटत तुला? मला दुस-यापेक्षा एखादा मार्क जास्त मिळाला तर मी यशस्वी ठरतो का? ही स्पर्धा मार्कांची न होता इगोंची आहे! अरे शेवटच्या क्षणी आपण ते पेपर्स मिळवण्याच्या मागे आपली शक्ती वाया घालवू नये असं मला वाटतं. आतापर्यंत अभ्यास करुन आपल्याला कमी मार्क्स मिळाले आहेत का? सांग ना आपलं काय नुकसान झालं आहे ते? आतापर्यंत आपल्याला कधीच गरज पडली नव्हती ती आज का पडतेय?" -राहुल्या.

       दूरवर बघत सम्या बोलला,

"राहुल्या, एका सिच्युएशनचा विचार कर, तुला माहीतीये की एखाद्याने, सुहासच घे ना, समज त्याने कॉपी करुन मार्क्स मिळवले आणि त्याला फर्स्टक्लास मिळाला आणि तुझा फर्स्टक्लास एका मार्काने गेला, आणि आपल्या कॉलेजला कँपसला एक चांगली कंपनी आली, तिने फक्त फर्स्टक्लास असलेल्यांना अ‍ॅप्टिट्यूड एक्झामला बसायची परवानगी दिली, कसं वाटेल तुला? सालं आपण इतका प्रामाणिकपणा करुन शेवटी हेच फळ मिळालं ना असंच वाटेल ना? त्या क्षणापुरतं तरी हा प्रामाणिकपणा काहीच कामाचा नाहीये असंच वाटेल ना तुला? मी अप्रामाणिकपणाचं समर्थन करत नाहीये, पण एक परिस्थिती तुझ्यासमोर मांडतोय! विचार कर, खरंच असं झालं तर? त्या क्षणी तुला वैताग येणार नाही? भाई, बाहेर तुला हे कुणीच विचारणार नाही की तू मार्क्स कसे मिळवलेत, किती मिळवलेत हेच विचारतील.अरे आपल्या फिल्डमधे एन्ट्री महत्त्वाची असते रे! तुला कितीही येत असलं, तू आपल्या फिल्डमधे कितीही मास्टर्स असलास तरी जोपर्यंत तुला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत तू स्वत:ला सिध्द करु शकत नाहीस! तुला फक्त एन्ट्री करायचीये आणि ती कशीही झाली तरी चालेल. ऐक, जब घी सीधी उंगलीसे नही निकलता तो फिर डब्बाही उल्टा करना पडता है! आणि आपल्याला तो करायचाच आहे! मी असं नाही म्हणत की आपण त्यावरच विसंबून राहू, पण क्वेश्चन्स खरे असले तर हातातून जायला नको असं मला वाटतं. शेवटी येनकेनप्रकारेण आपल्याला मार्क्स हवे आहेत. बाय हूक ऑर बाय क्रूक! काय वाटतं?"

     सम्याच्या या युक्तिवादावर सगळेच विचार करत होते. युक्तिवाद तर बिनतोड होता. जर मार्क्स हवे असतील तर पटो अथवा न पटो, भलेबुरे सगळे मार्ग तर अबलंबावेच लागणार होते. कुणाचंही नुकसान न करता जे जे करणं शक्य आहे ते ते करायलाच हवं असं सम्याचं मत होतं. आत्ता प्रश्न होता ते क्वेश्चन पेपर्स मिळवण्याचा!
...सम्याच्या डोक्यात त्याचीही योजना आकार घेत होती.


    एक दिवस राहुल्याने सुहासला सांगितलं," सुहास, तुला एक गोष्ट सांगायचीये! तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव , तो तुझा प्रश्न आहे, पण सम्या आणि त्याची गॅंग तुझ्या वाईटावर टपलेले आहेत! तुला कुठेकुठे आणि कसंकसं गोत्यात आणता येईल याच्यावर त्यांचा विचार चाललेलाय. मला एक मित्र म्हणून असं वाटतं की तू कुठल्याही प्रॉब्लेममधे येऊ नये! आणि हो... फोकसमधेही!"

राहुल्याने "फोकसमधे" अशा स्टाईलमधे आणि पॉज घेऊन म्हटलं की क्षणभर का होईना, पण सुहासच्या काळजात कळ उठली. त्याला वाटायला लागलं की हा तर असं सांगतोय की जसं याला सगळं माहितीये! याला खरंच तर माहीत नसेल? तो इतका घाबरला की राहुल्याच्या म्हणण्याची सत्यासत्यता तपासून बघण्याचंही त्याला सुचलं नाही. माणूस घाबरला की चुकांवर चुका करायला लागतो. त्याकरता त्याने त्याची शांतपणे विचार करण्याची शक्ती घालवायची असते. घाबरल्यावर जर ही शक्ती घालवली, तर माणूस नक्की चुका करतो. आणि या क्षणी राहुलला नेमकं हेच हवं होतं. राहुल्याच्या जाळ्यात तो अलगद सापडत होता.

      "तुला...काय म्हणायचंय काय राहुल?" -सुहासने सावधपणे विचारलं. सावधपणापेक्षा त्याच्या चेहे-यावर भीती स्पष्ट दिसत होती. राहुलच्या ते लक्षात येत होतं, पण तो तसं दाखवत नव्हता. तो आपण अगदी अनभिज्ञ असल्याचं दाखवत होता. नाहीतरी त्याला सुहासला हळूहळूच रिंगणात घ्यायचं होतं.


(क्रमश:)

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा