शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग ५)

     ढाब्यावर येऊन ते बसले. चहा येईपर्यंत कुणीच एकमेकांशी बोललं नाही. नाहीतरी सम्याला घाई करायचीच नव्हती. तो अगदी शांत बसला होता,वरुन अगदी नॉर्मल असल्यासारखा दाखवत असला तरी त्याच्या मनात आत्ता प्रचंड उलथापालथ चाललेली होती. सुहासच्या प्रत्येक प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं याची जुळवाजुळव तो कॉलेजमधून निघाल्यापासून करत होता.

     सुहासच्या मनातही चलबिचल होत होती. "सांगावं का याला? बरं सांगावं तरी का सांगावं? आणि काय सांगावं? हा बाकीच्यांना सांगणार नाही कशावरुन? आणि याने जर का सांगितलं तर आपण जमवून आणलेली सगळी भट्टी बिघडून जाईल. तसा चांगलाय हा! आपली आणि त्याची अशी काही दुष्मनीपण नाहीये! याला जर आपण आपल्या बाजूला ओढलं तर आपला फायदाच फायदा आहे! ते क्वेश्चन खरेच आहेत कशावरुन? एक गोष्ट आहे, स्वार्थ दिसायला लागला की माणूस आंधळा होतो. हा काही देव नाहीये! याचा फायदा होत असेल तर दोस्ती गेली अक्कलखाती! फक्त ही गोष्ट याला पटवून द्यायला हवी! आत्ताच... हीच वेळ आहे सम्याला राहुल्यापासून दूर करण्याची. राहुल्यावर सूड उगवण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. साला नेहाला माझ्यापासून दूर करतो काय? बघ राहुल्या मी तुझं कसं नुकसान करणार आहे! तुला कळणार पण नाही की तू गेलायेस! हीच वेळ आहे एका दगडात दोन पक्षी मारण्याची! नेहाबद्दल पण सम्याचं मत तसं चांगलं नाहीये! आता मरा, नेहा अन राहुल्या!" सुहास स्वत:वरच खुष झाला.

त्याला गालातल्या गालात हसतांना पाहून सम्या म्हणाला,
"काय रे एकटाच हसतोयेस? काय झालं?" अर्थात सम्याला अंदाज होताच की हा काय विचार करत असेल!

"कशी गम्मत असते ना दोस्त! आता बघ ना, तू त्या राहुल्याला इतकं समजावलं, पण ऐकलं का त्याने तुझं? तुझ्या दोस्तीची काही कदर आहे का त्याला? साला हा राहुल्या आधीच कुठूनतरी क्वेश्चन पेपर्स मिळवत असेल! आपण आपलं घासतोय! गेला ना तुम्हाला सोडून! त्याला काय गरज नाही आता आपल्या सगळ्यांची!" -सुहास.

रागाने सम्याच्या मुठी आवळल्या जात होत्या. सुहाससारख्या हलकटाने राहुल्याबद्दल असं बोलावं हे ऐकूनच त्याच्या डोक्यात तिडिक गेली होती. आणि "आपण"? हा कधी "आपल्यात" होता? साला स्वत: क्वेश्चन पेपर्स काढतोय आणि राहुल्याचं नाव बदनाम करतोय! पण आपल्याला आत्ता राग आलाय हे दाखवून चालणार नव्हतं. प्लॅन पार फिसकटला असता.

"जाऊ दे यार सुहास, होत असतं असं आयुष्यात! चालूच असतं! सोड!" - सम्या समजावणीच्या सुरात बोलला.
पण सुहास भडकला. सम्यालाही हेच हवं होतं. रागाच्या भरात माणसाच्या तोंडून ब-याचदा खरं निघूनही जातं.

"अरे काय जाऊदे! काही वाटतं का त्या राहुल्याला? साला खुशाल दोस्तीचा गळा घोटतो! ती नेहा पण तशीच! आज एकदम कसाकाय राहुल्या आठवला काय माहीत! तुला सांगतो सम्या, हा राहुल्या एकदम नीच आहे रे! नेहा माझ्याशी बोलायची ना तर किती जळायचा तो! जाऊ दे, ती पण तशीच निघाली, हलकट!" -सुहासचा संताप संताप होत होता. सम्याला जाणवलं, गाडी रुळावर यायला सुरुवात झालीये!

     "पण झालं काय रे तुमचं भांडण व्ह्यायला?" - सम्याने पाचर टाकली. आता तो अपेक्षीत परिणामाची वाट बघत होता... आणि... परिणाम झाला! ज्या बेसावध क्षणाची सम्या वाट बघत होता तो क्षण येऊन ठेपला होता.

    

.... रात्री अकरा वाजता "साकी" मधे सगळे जमलेले होते. सम्या, रव्या, निल्या, मन्या, पश्या आणि.... राहुल्याही!
"राहुल्या, आपला पहिला पार्ट तर एकदम सक्सेसफूल! थ्री चिअर्स!" - सम्या चित्कारला! "पण साला तुला शिव्या घालत होता रे! माझा संताप होत होता, त्याला विश्वास बसावा म्हणून मी पण घातल्या दोन-चार शिव्या तुला! सॉरी यार!"

"जाउ दे रे! तुझ्या काय शिव्या लागणार आहेत का? साल्या सॉरीबिरी जाऊ दे, काय झालं ते सांग!" -राहुल्या.

सम्या सरसावून बसला.
"काय सांगू यार, आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय!" -सम्या.

"अबे झालं काय होतं, सांग ना पटकन!" सम्या सोडून उरलेले वीस कान जीव गोळा करुन ऐकू लागले.

सम्या बोलू लागला,

"अरे, हा सुहास आधी बोलतच नव्हता, पण मी त्याला विश्वास पटवून दिला की मी राहुल्याचा किती तिरस्कार करतो! मन पोपटासारखं बोलायला लागलं बेणं! अरे त्याला काळे सरांनी काही टिप्स दिल्या आहेत, हेच क्वेश्वन इंटर्नल एक्झाममधे येतील म्हणून! साला आधी सांगतच नव्ह्ता. पण मग म्हणे यार तू तुझा फायदा बघ! मी देतो तुला क्वेश्चन्स! फक्त एक अट आहे, कुणालाच कळू देऊ नकोस! मी म्हणालो, बिलकूल नाही! साला माझ्या ग्रुपने माझ्या जीवावर आतापर्यंत उड्या मारल्या, आता लै झालं. साले कॉलेज संपल्यावर मला विचारणार पण नाहीत! जाऊ दे सगळ्यांना खड्ड्यात! मला काहीच कुणाशी घेणंदेणं नाहीये! अन तुला कुठून मिळाल्या विचारलं तर म्हणे यार तुला माहीत नाही का, पैसा फार मोठी चीज आहे! काळे सर पण माणूसच आहेत. राग,लोभ,हाव सगळं त्यांनाही लागू आहेच ना! बस, पैसा फेको, इस दुनिया मे सब कुछ मिल जाता है! मग मी विचारलं की नेहाशी तुझं भांडण का झालं? तर म्हणे तिला कुठूनतरी वास लागला की माझ्याकडे क्वेश्चन प्र्पर्स आहेत, तिने कदाचित माझी बॅग चेक केली असेल! मी लगेच त्याला उचकवला, साल्या तू इतका जवळ का येऊ देतोस कुणाल की ती व्यक्ती तुझी बॅगही चेक करू शकते! तर म्हणे की यार मी तिला चांगली दोस्त समजत होतो. अन मी तिला सांगितलं की असं काही नाहीये, तर डायरेक्ट भांडायलाच लागली. मला म्हणे मी सगळ्यांना सांगेन, तिला म्हटलं सांग, कुणी कसा विश्वास ठेवेल तेच बघतो मी! मी तिच्याबद्दल असं काही सगळ्या मुलामुलींमधे पसरवलं आहे की कुणीच तिच्याशी साधं बोलतही नाही! माझ्याविरुद्ध जाणं म्हणजे काय असतं ते तिला आता कळालंच असेल. बरं ती काळे सरांकडे पण जाऊ शकत नाही, हे तर चोराकडेच चोरीची तक्रार करण्यासारखं झालं! काळे सर तर तिला उभं पण करणार नाहीत! गेली ना आता दोन्ही बाजूंनी!"

       ... इतकं सगळं एकाच दमात बोलून सम्याला धाप लागली होती. त्याने पाण्याचा घोट घेतला आणि म्हणाला,"इंटर्नलचे पेपर्स फुटताहेत ही बातमी तर खरी आहे! आता आपण काय करायचं यावर परत विचार करावा लागणार आहे!"

सगळ्यांच्या डोळ्यात सुहासबद्दल घृणा दाटली होती. माणूस इतका खालच्या पातळीला जाऊ शकतो? आपण जर बलवान नसू तर एखाद्या बलवानाचं नुकसान पाहुन आनंद होऊ शकण्याइतका? अर्थात या ग्रुपचं काहीही नुकसान झालं नव्हतं. आणि काळे सर? एच.ओ.डींनीच असं केलं तर दाद कुणाकडे मागायची? हातात पूर्ण पुरावा असल्याशिवाय प्रिन्सीपॉल सरांकडे जाऊन पण उपयोग नव्हता! बरं ते काही अ‍ॅक्शन घेतीलच याची खात्री काय? आपल्या कॉलेजची नाचक्की होऊ नये म्हणून त्यांचा कल हे प्रकरण दाबून टाकण्याकडेच राहील ना? आणि एच.ओ.डींना कळालं की आपण त्यांची तक्रार केली आहे तर आपलं कॉलेज काय, पण करिअरही बरबाद होऊ शकतं! काय करावं बरं? सगळेच विचार करत होते.

एकदम सम्या म्हणाला, "अरे राहुल्या ती नेहा काय म्हणाली आज? तिथून काय अपडेट्स?"

"हाँ... अरे हीच गोष्ट तिने मला पण सांगितली की तिला अशी अशी शंका आहे! म्हणत होती, सुहास मला म्हणायचा की तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस, मग त्याने का केलं असेल रे असं? आणि नेहेमीप्रमाणे रडायला लागली!"

"डन इट! काय चालू आहे ते तर कळालं! पण सगळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला हे नाटक हे सेमीस्टर संपेपर्यंत असंच चालू द्यावं लागणार आहे. आता याचा पूर्ण सोक्षमोक्ष लावावाच लागेल. सुहासला म्हणा किंवा नेहाला म्हणा, अजिबात सुगावा लागता कामा नये! आणि मन्या, तू जास्त काळजी घे! साल्या तू ऑलरेडी सेंटी आयटम आहेस! लगेच विरघळतो!" -सम्या.

"नाही बे, साल्या तुमची साथ सोडेन का मी?" -मन्या.




...अर्धी लढाई तर जिंकलेली होती.



(क्रमश:)

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा