मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

ब्लॅक फ्रायडे (भाग २)

"अबे यार ते क्वेश्चन पेपर्स असतील!" -निल्या.
"असतील काय, आहेतच! पण प्रश्न असा आहे की याला हे मिळाले कसे? काळे सरांना याने पटवलं कसं?" -मन्या.
"एक मिनिट, त्याच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स क्वेश्चन पेपर्सच आहेत याबद्दल आपल्याला खात्री नाहीये. असा फारतर आपण अंदाज बांधू शकतो." -सम्या.
"पण हा अचानक असा बदलला कसा? काहीतरी तर शिजतच असेल ना?" - रव्या.
"ते काही नाही, आत्ताच्या आत्ता त्याच्या घरी जाऊ आणि त्याच्या घरच्यांसमोरच त्याला विचारू! साला एक घाव अन दोन तुकडे!" - मन्या.
"अहो भडकेश, शांत व्हा जरा! त्याला सुगावाही लागायला नको की आपल्याला काही शंकाही आली आहे! आणि मन्या, भडकूपणा कमी कर जरा! एक दिवस गोत्यात येशील!" -सम्या.
मन्या गप्प बसला. असंही सम्यापुढे कोणीच काही बोलायचं नाही. तो या टीमचा अलिखित ’कॅप्टन कूल’ होता. कितीही अवघड परिस्थिती कशी शांतपणे हाताळायची याचं त्याला चांगलंच भान होतं. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात त्याच्याकडे आपोआप नेतृत्व चालत यायचं. आताही तो घडलेल्या सगळ्या प्रसंगांची मनातल्या मनात जुळवणी करत होता.
"आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं! आपण समजत होतो की सुहास त्याच्या अभ्यासाने पुढे चाललाय, पण काहीतरी वेगळाच वास यायला लागलाय! याला आपण सगळ्यांनी काय थोडी मदत केली होती का? प्रोजेक्ट्स हा उचलणार आणि आपल्याकडे येऊन समजवून घेणार! इथे आपण सगळे दिवसा अभ्यास करुन करुन रात्री प्रोजेक्ट्स बनवतोय, अन रिझल्ट लागला की याला आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त मार्क्स! का? काय करतो काय हा? कसे काय मिळतात याला इतके मार्क्स? आपण मेहनतीत कुठे कमी पडतोय का? तसं असतं तर आपलंच आपल्याला जाणवलं असतं! आपण बरं काही कॉपी वगैरे पण करत नाहीयेत! कॉपी तर यालापण करतांना आपण कुणीच बघितलं नाहीये! परीक्षा हॉलमधे आला की सगळा पेपर आधीच पाठ असल्यासारखा लिहून मोकळा होतो हा! काय आहे काय हे? बरं वर्गात किंवा क्लासला शिकवतांना पण हा नॉर्मल असतो. जे प्रश्न आपल्याला पडतात ते यालापण पडतात... की हा दाखवतोय असं? याला आधीच माहीत असतं का सगळं? तसं असेल तर याचा सोर्स काय? कोण मदत करत असेल याला? का? आपला ग्रुप सगळ्यात पुढे असतो हे कुणाला बघवत नाहीये का? आपण तर सगळे मेहनत करुन पुढे जातोय ना? मग? असं काय घडलं की सुहासने आपल्या सगळ्यांशी अशी गेम खेळावी? काय कारण असावं.... हे तर नक्की आहे की तो आपल्याशी गेम खेळतोय! पण मोटीव्ह? त्याचं काय?"
विचार करुन करुन सम्याचं डोकं पार भंजाळून गेलं होतं.

अचानक रव्या ओरडला, "अबे त्या नेहाला पाहिलंय का कुणी गेल्या आठवड्यात कॉलेजमधे?"
या गोष्टीवर कुणीच विचार केला नव्हता! मुळात नेहा, सुहास आणि हे प्रकरण यांचा काही परस्परसंबंध असू शकतो हेच कुणाच्या डोक्यात आलं नव्हतं!
"गप बे, च्यायला इथे चाललंय काय आणि तुला एकदम ती कशीकाय आठवली?" -मन्या.
"अबे मागच्याच्या मागच्या शनिवारी ती सुहासशी जोरजोरात भांडत होती. मी कॅन्टीनमधे तुम्हाला शोधायला गेलो होतो तेव्हा पाहिलं मी!" -रव्या.
"एक मिनिट एक मिनिट, नक्की कशावरुन भांडत होते ते दोघं?" -सम्या.
"नक्की नाही माहीत यार, पण ती म्हणत होती की मी तुझी इतकी जवळची मैत्रीण आहे पण इतकी साधी गोष्ट तू मला सांगीतली नाहीस! मला वाटलं हे यांचं नेहेमीचंच!"
"मग सुहास काय म्हणाला?" -सम्या. त्याच्या डोक्यात आता चक्र फिरायला लागली होती. इथेच काहीतरी ग्यानबाची मेख आहे.
"बरं मग पुढे काय झालं?" -सम्या.
"काही नाही, सुहासने तिला डोळे पुसायला आपला रुमाल दिला!" -रव्या.
"रव्या, अक्कल नसणं ही चूक असूच शकत नाही! साल्या, ते नाही विचारत की तो कितीदा खोकला, तिने कोणत्या रंगाचा ड्रेस घातला होता, त्याचा रुमाल कॉटनचा होता की टेरिकॉटचा! मुद्द्याचं बोल! नेमके कुठल्या विषयावर भांडत होते ते?"
"अबे मी कशाला लक्ष देऊ? दर आठवड्याला सात तरी मुली सुहासशी भांडतात! अन तो पण दुस-या दिवशी अगदी सगळ्या पोरींना खांदा देतो...... रडायला!" -रव्या.
"सुहास,सॉरी ना रे! काल मी उगाच भांडले तुझ्याशी! मलाच इतकं वाईट वाटलं ना नंतर! प्लीज सुहास! आय अ‍ॅम सॉरी ना!" - विज्याने लगेच मुलींची नक्कल करुन दाखवली. सगळेच हसले, ताण थोडासा मोकळा झाला.
"अबे म्हणून मला वाटलं की हे नेहेमीचंच! म्हणून मी सरळ तिथून कल्टी मारली! काळं कुत्रं पण बघत नव्हतं त्यांच्या भांडणाकडे!" -रव्या.
"अबे त्यानंतर ती गेला पूर्ण आठवडा नव्हती यावर विचार करा ना!" -सम्या.
"अबे गेली असेल गावाला, नाहीतर असेल काही प्रॉब्लेम, तिला काय, कॉलेजला आली नाही तरी तिच्या वह्या आणि नोट्स सुहास पूर्ण करेलच!" -निल्या.
"नाही यार, मला वाटतंय की काहीतरी गोंधळ घातलाय या बेण्यानं!" - मन्या.
"गप बे, जास्तीचे अकलेचे तारे तोडू नको! सुहासला वेळ तर मिळाला पाहिजे तिच्याकडे परत बघायला! सध्या या आठवड्यात सुवर्णाच्या गळ्यात गळे घालून फिरतोय तो! अगदी यात्रेत हरवलेले भाऊ बहिण वाटतात ना दोघं! ही ही ही ही!" -रव्या. सगळे परत हसायला लागले!
"गॉसिपिंग काय करताय? काय करायचं त्यावर विचार करा! " -सम्या. हा अजून विचारातच होता.
"रव्या, सुहासचे नेमके एक्प्रेशन्स काय होते ते भांडत होते तेव्हा?" - सम्याने विचारलं.
"अम्म्म... ती काहीतरी खाजगी बाब सार्वजनिक करतेय असा चेहेरा झाला होता त्याचा!" - रव्या.
"ओ मालक, आम्हालाबी कळेल असं बोला की!" -मन्या.
"गप रे मन्या! कळेल तुला पण!" -सम्या.
बराच वेळ असाच शांततेत गेला.

"राहुल्या!" सम्याने हाक मारली. इतका वेळ एका कोप-यात शांत बसलेल्या राहुलकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. मात्र आपण जो विचार करतोय तो विचार राहुल्याही करत असेल असं सम्याला वाटतंच होतं. राहुलने सम्याकडे असं पाहिलं की सम्याला काय म्हणायचंय हे त्याला बरोबर कळलंय!
घड्याळात पाहिलं तर चार वाजत होते. बाहेर नीरव शांतता होती.
"चल, शिवनेरीवाल्याची टपरी उघडली असेल, एक एक कटींग मारुन येऊ!" -सम्या. आजूबाजूची प्रजा बसल्या जागीच झोपून गेली होती. फक्त सम्या अन राहुल्या तेवढे जागे होते. शांतपणे उठून राहुल्याने पायात चपला सरकवल्या, दार पुढे ओढून घेतलं आणि तो आणि तो आणि सम्या ’शिवनेरी टी स्टॉल’ कडे निघाले.
अजून ना पहाट होती ना पूर्ण रात्र! एक संधिकाल असतो अशा वेळी, रात्रीच्या गर्भातून एक नवीन दिवस जन्माला येणार असतो. एक पूर्ण नवा दिवस! अगदी कोरा करकरीत! येताना तो आपलं प्राक्तनही बरोबर घेऊन आलेला असतो. त्याच्या नशिबात काय लपलेलं आहे हे तो दिवस पूर्ण गेल्याशिवाय कळत नसतं.
"सम्या, तुला काय वाटतं?" -राहुल्या.
"काय वाटणारे? असं वाटतंय की सगळीकडे एक मळभ दाटून आलंय! पण यात एक काहीतरी चांगलं लपलेलं आहे! काहीतरी चांगलं होणार आहे हे नक्की! मला या गोष्टीचा संताप येतोय की सुहाससारख्या मुलाने, ज्याला आपण एक चांगला मित्र समजत होतो, त्याने आपल्याबरोबर असं करावं!"
"तरी मी तुला सांगत होतो, की त्याला प्रोजेक्टमधे मदत करायची काहीही गरज नाहीये! उलटलाच तो शेवटी!" - राहुल्या.
"तसं नाहीये रे, जरासा भटकलाय तो, आणि मदतीचं म्हणशील तर आपण कुणीच असा विचार करत नाही मदत करतांना की ही व्यक्ती पुढेमागे आपल्याला मदत करेल की नाही! फक्त हेच बघायचं की या व्यक्तीला मदत केल्याने आपण तर कुठे विनाकारण गोत्यात येत नाहीये ना! सुहासच्या बाबतीत आपला सगळयांचाच अंदाज चुकलाय यार!" -सम्या.
एक एक कटींगचा ग्लास घेऊन ते शांत बसून राहीले. कुणाचीच बोलायची इच्छा होत नव्हती. बराच वेळ असाच निघून गेला.
"चल यार, आज परत प्रॅक्टिकल आहे... जाऊ परत रुमवर!" - राहुल्या.
तेव्हढ्यात सम्याने पाहिलं, सूर्योदय होत होता. अचानक सम्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं...


"राहुल्या, तो बघ सूर्य! कशी प्रसन्न पहाट होतेय! अशी पहाट आपणही आणणार आहोत... आणूच!".

(क्रमश:)

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा