शनिवार, २९ जानेवारी, २०११

ट्रॅव्हल्स

           पुण्यातून घरी जाण्यासाठी मला ट्रॅव्हल्स हाच एकमेव सोयीचा मार्ग आहे. कारण चारशे किलोमीटरचा प्रवास मी बसने तर नक्कीच नाही करु शकत! ऐनवेळी जाणं होत असल्याने ट्रेनचा प्रवासही शक्य नाहीये. शेवटचा पर्याय म्हणजे ट्रॅव्हल्स!

              तर गेल्या शुक्रवारी मी ट्रॅव्हल्सने घरी यायला निघालो आणि मला या ट्रॅव्हल्सवाल्यांच्या मनमानी कारभाराचा चांगलाच अनुभव आला.

             झालं काय की एकतर गाडी पाऊण तास उशिराने आली. बर ड्रायव्हर महाशयांनी वाकडेवाडीला एक तास उभी करुन ठेवली. जवळजवळ अकरा वाजता गाडी पुण्याबाहेर पडली. संध्याकाळी मला ऑफिसमधून यायला वेळ झाला होता म्हणून मी ढाब्यावर जेवण करायचं ठरवलं होतं. तर या ड्रायव्हर साहेबांनी साडेबारा वाजता ढाब्यावर गाडी उभी केली. तोपर्यंत भुकेने प्रचंड कासावीस झालो होतो. जळगावला पोचलो तेव्हा सकाळचे साडेसात वाजले होते. सकाळी सहाच्या आधी जळगावात पोचणारी गाडी इतक्या उशिराने पोचलेली पाहून ड्रायव्हर साहेबांच्या कूर्मगती ड्रायव्हिंगची कल्पना आलीच! जळगावला जवळजवळ सर्वच गाडी खाली झाली. आम्ही भुसावळला जाणारे फक्त नऊ जण उरलो होतो. सर्वांनी चला चलाचा गलका केल्यावर गाडी निघाली. तरी जळगावमध्ये एक तास मोडलाच!

              खरी कमाल तर यापुढेच झाली. जळगावच्या बाहेर गाडी आली न आली तोच आमच्या "सामर्थ्यशाली सारथ्याने" परत एकदा थांबवली! का म्हणून विचारलं तर म्हणे क्लिनर (यांच्या भाषेत किन्नर, आणि हा यक्ष!) गावात गेलाय, येईल पाच मिनिटात! पंधरा मिनिट झाले तरी त्याचा काही पत्ता नाही! लोक आरडाओरडा करायला लागले तर हा सरकारी कर्मचा-यांसारखा ढिम्म! अजून पाच मिनिटांनी एक ओम्नी येऊन थांबली. त्यातून "किन्नर" आणि त्या ओम्नीचा सारथी उतरले.(हा सारथी बहुतेक गंधर्व असावा! आमचे किन्नर साहेब त्याला आणायला गेले होते!).

’किन्नर’ साहेब म्हणाले,"चला सगळ्यांनी या गाडीत बसून घ्या!".
काही लोक लगेच बॅगा वगैरे घेऊन उतरायला लागले.
आता मात्र माझा संयम संपला! आणि त्या यक्ष आणि किन्नर जमातीबरोबर जरासा ’प्रेमळ’ संवाद घडला! तो असा:

मी: का? या ओम्नीने का जायचं?
किन्नर: साहेब नऊच लोक आहेत, त्यामुळे...
मी: मग काय झालं? आमच्याकडे भरपूर सामान आहे, त्याचं कसं करायचं? माझ्याकडेच पाच बॅग्स आहेत.
किन्नर: मी बसवतो ना बरोबर! तुम्ही काळजी करू नका साहेब!
मी: एका ओम्नीत नऊ लोक! सामानासुमानासकट! कसं शक्यय?
किन्नर: खरं सांगू का साहेब, आमच्या मालकांना एक लग्नाची ट्रीप मिळालीये जळगाव ते भुसावळ अशी! त्यामुळे...
मी: म्हणजे आम्ही इतके स्लीपरने येणारे मूर्ख आहोत का? आम्ही इतके पैसे का भरतो? प्रवास नीट व्हावा म्हणून ना? की तुमच्या मालकाला फक्त पैशाशी घेणंदेणं आहे! मला नंबर द्या त्यांचा! मी बोलतो त्यांच्याशी! (बाकीच्या प्रवाशांना) कुणीच जायचं नाही ओम्नीतून!
गंधर्व (ओम्नीचालक): साहेब नवी गाडीये आपली!
मी: एक मिनिट, तुम्ही मधे बोलू नका! नवी असो की जुनी, आम्हाला काहीही कर्तव्य नाहीये!
(आमच्या किन्नरला)हे बघा, तुमच्या मालकाला औरंगाबादहून ट्रीप मिळाली असती तर तिथून आम्हाला ओम्नीतून पाठवलं असतं का? आम्हाला काय मूर्ख समजलात का? तुम्ही आम्हाला भुसावळपर्यंत स्लीपरने पोचवण्यासाठी कमीटेड आहात. एकतर दुसरी ट्रॅव्हल्स आणा नाहीतर हीच गाडी भुसावळ पर्यंत घेऊन चला! नऊच प्रवासी आहेत तर त्याला आम्ही काय करणार! एकतर सकाळी सकाळी डोकं फिरवू नका! मला नंबर द्या मालकांचा!
किन्नर: जाऊ द्या साहेब, चला! (त्या ओम्नीवाल्याला) तू जा आता, तुझ्याशी नंतर बोलतो!
ओम्नीवाला: xxxxx xxxxxxxxx xxxxxxxx xxx
              गपगुमान त्याने गाडी भुसावळपर्यंत आणली!

शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

क्लिकक्लिकाट

         माकडाच्या हाती कोलीत, तसा माझ्या हातात कॅमेरा आल्याबरोबर मी सगळीकडे क्लिकक्लिकाट करत सुटलो होतो. वाट्टेल त्याचे, वाट्टेल तसे फोटो काढून झाल्यावर लक्षात आलं की अरे, कॅमे-याचं मेमरी कार्ड भरत आलंय! तरीपण माझा क्लिकक्लिकाट काही थांबायचं नाव घेईना! शेवटी एकदाचं भरलंच ते! मग सगळे फोटोज लॅपटॉपमधे कॉपी केले, आणी एक एक बघत होतो. त्यात मला नेचर फोटोग्राफीची हुक्की आल्यावरचे पण दोन फोटो होते. तेच इथे डकवतोय... एक अंगणातल्या जास्वंदीचा आहे आणि दुसरा गोकर्णाचा फुलाचा!



शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

असा तोल जाता कुणी सावरावे?

ठिकाण: आमची रोजचं चहाचं दुकान
वेळ: संध्याकाळची

तर हे दुकान म्हणजे एक कट्टाच आहे. तिथे नुसतं उभं राहिलं तरी अर्ध्या तासात किमान एक डझन मित्र भेटून जातात. संध्याकाळी तर दुकानासमोर गाडी लावायला जागा नसते. दुकानाचा मालक पोरगेलासाच आहे. राजस्थानी आहे. त्याने त्याच्या हाताखाली काम करायला काही मुलांना पण त्याच्या गावाकडून आणलेलं आहे.
... हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मी त्या दुकानात पाहत असलेला प्रसंग!
तर झालं काय, की काल संध्याकाळी तो एका कामगाराला मारत होता. जोरजोरात राजस्थानीत शिव्या देऊन तो त्याला नुस्ता जोरजोरात हाणत होता... आणि बाकीचं पब्लिक नुस्तं बघत होतं. दुरुन बघणा-याला वाटेल की किती या बिच्या-या कामगाराचे हाल आहेत! इतक्या लोकांसमोर मालक त्याला मारतोय! कुणी विचारलं तर त्याला म्हणत होता की तुम्ही मधे बोलू नका. तो कामगार बिचारा खाली मान घालून गप मार खात होता. शेवटी मालक मारुन मारुन थकला, बसला आणि म्हणाला, "काय सांगू साहेब, हे इथे बिड्या ओढतंय! मी इथे चहाबरोबर इतक्या सिगरेटी विकतो, पण कुणी माझ्या कुठल्या कामगाराला सिगारेट फुंकताना पाहिलंय का? कधी मला तरी पाहिलंय का? ह्या पोरांना त्यांचा आईबापांनी हे काहीतरी पुढे जातील, मोठे होतील म्हणून इथे इतक्या लांब माझ्या भरवश्यावर पाठवलंय! अन हे इथे येऊन हे धंदे करतायेत! यांच्या आईबापाला कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल? मी यांच्या पोराला बिघडवलं असं म्हणतील ते! माझं जाऊ द्या हो, त्याबद्दल पण काही नाही, पण हे चांगलंय का? आज बिड्या ओढतोय, उद्या दारूही पिईल! मग झालं ना आयुष्याचं मातेरं!"

त्याचा त्रागा ऐकून काही सज्जनांनी जनाची नाही पण मनाची बाळगून आपल्या हातातल्या धूम्रकांड्या पायाखाली चिरडल्या!

माझ्या मनात एक चित्र उभं राहील... डेव्हलपर सिगारेट पिऊन आला म्हणून पी.एम. त्याला मारतोय!.. क्षणभर हसूच आलं! कितीही विचार केला ना तरी असं शक्यचं नाहीये! त्या कामगाराला वाटलं नसेल का की एकदातरी विरोध करावा! पण त्याच्याजवळ काही कारणच नव्हतं! आपल्यासारख्या पांढरपेशांना जर कुणी हटकलं तर आपण म्हणणार.. "तुझ्या पैशाने पितो का? तू तुझं बघं! हा माझा पर्सनल प्रश्न आहे!" खरचं.. आपण जितके ग्लोबल होत जातो तितके संकुचितही होत जातो. कधी कधी वाटतं आपलं जर चुकलं तर आपल्यालाही असंच कुणीतरी मारावं... आईनंच! आपण जितके जितके मोठे होत जातोय ना तितके तितके एकटे होत जातोय. तो पोरगा सावरेलही, कुणी सांगावं? आपल्याला कोण सावरणार?