रविवार, ११ जुलै, २०१०

स्वामनिष्टेपि कुरुते परहानि खलो ध्रुवम...

        शीर्षक वाचून एकदम गोंधळात पडला असाल ना? नाही नाही.. माझा संस्कृतात लिहिण्याचा कुठलाही विचार नाहीये! इतकं संस्कृत मला नक्कीच येत नाही. आज दोन बैराग्यांची ही झेनकथा वाचली आणि शाळेत असतांना संस्कृतच्या पुस्तकातला एक धडा आठवला, खरं तर ती गोष्ट होती. या दोन्ही कथांमधे केवळ "दोन बैरागी" इतकंच साम्य आहे.
          "स्वामनिष्टेपि कुरुते परहानि खलो ध्रुवम... " चा अर्थ आहे "दुस-याचं वाईट करतांना आपलं पण थोडंफार नुकसान होतंच!"
         होतं काय, की एका आश्रमात दोन साधू रहात असतात, सुबुद्धी आणि दुर्बुद्धी! दोघांचं एकदम विळ्याभोपळ्याचं नातं असतं. एकदा ते तपश्चर्येला बसतात. दिवस, महिने, वर्ष निघून जातात तरी त्यांची तपश्चर्या सुरुच असते. शेवटी एकदाचे देव प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देतात आणि वर मागायला सांगतात. (इथपर्यंत अशा सगळ्या गोष्टी कॉमनच असतात!)
      तर देव त्यांना तीन वर मागण्याचं वरदान देतात पण एक अट घालतात... "जो कोणी आधी जे मागेल ते दुस-याला न मागता दुप्पट मिळेल!" झालं... दोघंही विचार करतात काय मागावं? बरं जो आधी मागेल त्याला नंतर मागणा-यापेक्षा निम्मंच मिळणार असतं. असा बराच वेळ निघून जातो. देव म्हणतात "अरे मूर्खांनो मागा पटकन नाहीतर मी चाललो!"
         शेवटी दुर्बुद्धी म्हणतो,"देवा माझा एक पाय तोड,एक हात तोड आणि मला एका डोळ्याने आंधळा कर".
"तथास्तू!"
    आता दुर्बुद्धी एका डोळ्याने आंधळा होतो, त्याचा एक हात आणि एक पाय जातो.......... आणि सुबुद्धीचे दोन्ही हातपाय आणि दोन्ही डोळे जातात...
           म्हणजे काय तर सुबुद्धीला अपंग बनवण्यासाठी दुर्बुद्धी स्वत:च्या एका हातापायाचा आणि एका डोळ्याचा बळी देतो. हा या सुभाषिताचा सारांश आहे.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा