शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

धर्म करा अन चावडी चढा !

"धर्म करा अन चावडी चढा" अशी मराठीमधे एक म्हण आहे. थोडक्यात "आ बैल मुझे मार!".
माझ्या एका मावसभावाची भाची, म्हणजे वहिनींच्या बहिणीची मुलगी मुंबईत एका चांगल्या नावाजलेल्या चित्रकला महाविद्यालयात शिकते आहे. एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा तिची आई,म्हणजे वहिनींची बहिण म्हणाली की हिच्यासाठी वेब डिझायनिंगचं काही फ़्रीलान्स काम असेल तर सांगा. ती करून देईल. मी तिने काढलेले चित्र बघितले. खरंच अफलातून होते. म्हटलं ठीक आहे. मी बघतो.

दोन-चार दिवसांनी माझ्या एका मित्राचा फोन आला. त्याने एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु केलेली आहे. त्याला क्लायंटला एक डेमो द्यायचा होता. त्याने विचारलं की तुझ्या ओळखीचा कुणी फ्रीलान्स वेब डिझायनर आहे का? मी म्हटलं एक मुलगी आहे, तिला विचारून तुला सांगतो. मग मी या बाईसाहेबांना फोन केला. या काम करून द्यायला तयार झाल्या. मित्राने मला तिचे वर्क सँपल्स पाठवायला सांगितले. पुन्हा तिला फोन, पुन्हा याला फोन. माझा नुसता शटलकॉक झाला होता. बरं या मॅडमचा मोबईल नंबर त्याला द्यायला या नाखुष होत्या. त्यामुळे सगळं कम्युनिकेशन माझ्यामार्फत चाललं होतं. म्हटलं हेही ठीक सही! एकीकडे मित्र तर एकीकडे नातेवाईक! कुणालाच काही बोलू शकत नाही.नाहीतरी व.पुं.नी एका ठिकाणी म्हटलंच आहे,"त-हेवाईक या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे नातेवाईक!" मित्र रोज फोन करून विचारत होता की झालं का काम! या मॅडमचं काम ढिम्म हलायला तयार नाही. वरून त्यांच्या आईसाहेब आम्हाला विचारतात,"ते काम मेल करण्यासाठी तिला सायबर कॅफेमधे जावं लागतं, त्यात पैसे जातात. ते तुमचा मित्र देईल का ?" अरे! आम्ही जॉब शोधायचा असतो तेव्हा सायबर कॅफेमधे जातो ते पैसे काय आम्ही आमच्या कंपनीकडून वसूल करतो का? कमाल आहे! तरी मी मित्राला त्यासाठी तयार केलं.
शेवटी डेडलाईन अगदी जवळ आली आणि मित्र अन मी गॅसवर! मी बाईसाहेबांना फोन केला तर त्या फोन घ्यायला तयार नाहीत. नंतर तर फोन कट करताय. असला संताप झाला माझा! झेपत नसेल तर आधीच नाही सांगायचं, नाहीतर कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण करून द्यायचं हा साधा नियम यांना माहीत नाही का? मित्रासमोर तरी माझी सगळी विश्वासार्हता धुळीत मिळाली की नाही!
मग मी मित्राला सांगितलं की असं असं झालं. शेवटी त्याने ते काम एका दुस-या बॅक अप कडून पूर्ण करून घेतलं. नंतर नेहेमीच्या कामात मी ही घटना विसरून गेलो. नंतर एका दिवशी तिच्या आईचा मला फोन आला. "अहो आमचा कॉम्प्युटर बिघडला आहे. तुम्हाला वेळ असेल तर जरा येऊन बघता का? किंवा तुमच्या एखाद्या मित्राला तरी पाठवा!" म्हटलं हीच वेळ आहे सव्याज परतफेड करण्याची! हान सावळ्या! त्यांना म्हटलं, "अहो मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मला आणि माझ्या कुठल्याच मित्राला हार्डवेअर मधलं काहीच कळत नाही. मुंबईत लाखाने हार्डवेअर इंजिनिअर्स पडलेत. त्यांना विचारा! आणि आता मी तुमचा फोन कट करू शकतो किंवा मी उचलला नसता तर! माझ्यात सौजन्य अजूनही बाकी आहे आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेताहात! तुमचं काम वेळेत न पोचल्याने क्लायंटने मला पाचशे रुपये फाईन केला! ते कोण भरणार? तुम्ही नेटच्या खर्चाची गोष्ट करत होतात आणि इथे मला विनाकारण भुर्दंड बसला तो वेगळाच! परत त्या क्लायंटशी माझे व्यावसायिक संबंध खराब झाले ते वेगळंच! इतकं होऊनही तुम्ही माझ्याकडून मदतीची अपेक्षा कशी करू शकता? मला गेलेल्या पैशांचं दु:ख नाही, पण मनस्ताप किती झाला! निव्वळ तुम्ही वहिनींची बहिण आहात म्हणून मी काही बोललो नाही!"
इतकं फायरिंग ऐकल्यावर बाईसाहेब गुपचुप! मुळात त्यांनी माझ्याकडून असल्या फायरिंगची अपेक्षाच केली नसावी! अरे! तुम्ही मला गृहीत कसं काय धरता? तुमचा मुलगासुद्धा तुम्हाला त्याला गृहीत धरू देत नाही, मग माझाकडून ही अपेक्षा का?
त्यांनी गुपचुप फोन बंद केला! मग मी भावाला फोन करून सगळं सांगितलं. तो म्हणाला बरं झालं तू बोललास ते! आता कुणाबरोबरही असं वागतांना ते दहादा विचार करतील.

शेवट काय, तर "धर्म करा अन चावडी चढा !"

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा